IND vs IRE: अभिषेक शर्माचं अर्धशतक हिसकावून घेतलं, सामन्यानंतर एक धाव कापण्याचं कारण काय?
GH News June 27, 2026 11:11 PM

आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाला सहज हरवू हा आत्मविश्वास टीम इंडियाच्या अंगाशी आला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने भारताला 38 धावांनी पराभूत करून दणका दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने भारताला पहिल्यांदाच पराभूत करत इतिहास रचला. तसेच भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूर्ण 20 षटकंही खेळता आली नाही, हा दुहेरी धक्का बसला तो वेगळा.. असं असताना या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण आता त्याच्या खात्यातून एक धाव कमी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या खात्यातील अर्धशतक हुकलं आहे. अभिषेक शर्माने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 20 चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. पण आता अर्धशतक एका धावेने हुकलं असंच म्हणावं लागेल.

अभिषेक शर्माचं अर्धशतक हुकण्याचं कारण की..

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याची ही त्याची पाचवी वेळ म्हणून कौतुक करण्यात आलं. कारण या आधी कोणत्याही फलंदाजाने तीनपेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे वेगवान अर्धशतकांचा मान त्याला मिळाला होता. पण आतातून एक अर्धशतक वजा झालं आहे. सामना संपल्यानंतर धावफलकावर अभिषेकची धावसंख्या 50 ऐवजी 49 दाखवण्यात आली. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. चुकून झालं असावं असं अनेकांना वाटलं. पण त्याच्या धावसंख्येतून खरंच एक धाव वजा केल्याचं कळताच अनेकांना धक्का बसला.

अभिषेक शर्माच्या धावसंख्येत एक धाव चुकून जोडली गेली होती. ही एक धाव डावाच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आली होती. पण ही धाव अभिषेकच्या बॅटने नाही तर लेग बाय होती. सामन्यानंतर ही चूक दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे अभिषेक शर्मा अर्धशतकापासून वंचित राहिला. खरं तर सामना सुरू असताना अभिषेक शर्माने अर्धशतक साजरं केलं म्हणून बॅटही वर केली होती. पण आता त्याच्या खात्यात अर्धशतक नसेल हे स्पष्ट झालं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.