'ऑपरेशन टायगर'च्या आडून काय राजकारण शिजतंय? CM फडणवीसांचं नाव घेत ठाकरेंनी सांगितली राजकीय खेळी
Tv9 Marathi June 28, 2026 03:45 PM

उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे बंडखोरांचा समाचार घेत आहे. देशात ‘ऑपरेशन टायगर’च्या आडून वेगळंच राजकारण शिजत असल्याचा दावाही उद्धव ठाकरेंनी केलाय. देशात ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरु असून एका गटाला त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा दावाच उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरेंच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘आमच्या पक्षात अंतर्गत गटबाजी नाही. तशी तर सर्व पक्षात दिसते. त्यांनी फोडाफोडीला ‘ऑपरेशन टायगर’ नाव दिलं. पण हे ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? ही त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी आहे. देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येऊ द्यायचं नसेल. त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नसेल, त्यामुळे कुणाची तरी ही खेळी असावी’.

फुटीर खासदारांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फुटीर खासदारांकडे लक्ष दिलं असतं तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. आता वरवर उपाययोजना करून चालणार नाहीत. त्यासाठी गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत असून मतदारांनी त्यांच्या उमदेवारांना ठरवून पाडलं पाहिजे. ही गद्दारीची कीड ठेचली पाहिजे. नाही तर भविष्यात लोकशाही वाचणार नाही. काही लोकांनी आईची शपथ घेतली होती. आता त्यांना शपथेची दुष्परिणाम दिसतील’.

‘फुटीर खासदार खासगी निधीसाठी गेलेत. त्यांचा खासदार फंड किती खर्च झाला. तो त्यांनी खर्च केलेला नाही. आमच्या अनिल देसाई, अरविद सावंत यांच्याकडे त्यांचा हजेरीपट आहे. फुटीरांनी किती वेळा लोकसभेत मतदारसंघाच्या प्रश्नावर तोंड उघडलं. त्यांनी किती वेळा संबंधित मंत्र्यांकडे जाऊन प्रश्न सोडवलाय, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.