छत्रपती संभाजीनगरातील पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कॅन्टीनमधील पोह्यात आळी आणि भातामध्ये झुरळ आढळल्याचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर विद्यार्थ्याने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने घेतली.त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या विभागाने संबंधित कॅन्टीनवर धडक कारवाई करत त्याचा परवाना तात्काळ निलंबित केलाय.
राज्यभर सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकाने कॅन्टीनची सखोल तपासणी केली. या तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आलीये. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले आणि इडली रव्याचा मुदतबाह्य साठा आढळल्याने तो जागेवरच जप्त करून नष्ट करण्यात आला. याशिवाय, खाद्यपदार्थांमध्ये बेकायदेशीररीत्या हानिकारक खाद्यरंगांचा वापर होत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
अंबरनाथमध्ये मिनरल वॉटर कंपन्या वापरतायत टँकरचं पाणी?
अंबरनाथमध्ये मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्या टँकरने पाणी घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंपनीतला व्हिडीओ समोर आला असून एमआयडीसीत अशाप्रकारे टँकरने पाणी घेण्यास परवानगीच नसल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आता या कंपन्यांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह एमआयडीसीकडून कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे प्रकरण?
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत कंपनी आहे. या कंपनीत पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेय तयार केली जातात. ही कंपनी सर्रासपणे टँकरने पाणी घेत असल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे नवीन पाले एमआयडीसीतील कंपनी सुद्धा टँकरने पाणी घेत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. वास्तविक एमआयडीसी क्षेत्रात सर्व कंपन्यांना व्यावसायिक नळजोडण्या एमआयडीसीने दिलेल्या असल्यामुळे कोणत्याही कंपनीला बाहेरून पाणी घेण्याची परवानगी नसल्याची माहिती खुद्द एमआयडीसीच्याच अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेय तयार करणाऱ्या या कंपन्या टँकरचं पाणी नेमकं कशासाठी घेतात? त्यांच्याकडून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. याकडे आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आणि एमआयडीसीने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय.