Devendra Fadnavis | मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस….
Tv9 Marathi July 06, 2026 04:45 PM

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि शक्यतो प्रवास टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत दरवर्षी मान्सून काळात सरासरी 800 झाडे कोसळतात. मात्र, काल एकाच दिवसात तब्बल 350 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, आजची परिस्थिती त्याहून अधिक गंभीर असू शकते. त्यामुळे खासगी कंपन्यांनी शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच तरुणांनी हवामान लक्षात घेऊन पर्यटन आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी मुंबईतील दुर्घटनांवरही भाष्य केले. काल कोसळलेली इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगत, त्या इमारतीचा ढिगारा शेजारील झोपडीवर कोसळल्यामुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई–पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आणि अडकलेल्या वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू केले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. संपूर्ण महापालिका, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित विभाग युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आजची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात या नैसर्गिक आपत्तीबाबत सविस्तर निवेदन उद्या सादर करणार असल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.