School Holiday: पावसाचा 'रेड अलर्ट'; पालघरमधील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
Saam TV July 07, 2026 12:45 AM
  • सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

  • जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला.

  • मुंबई, पुणे, कोकण आणि नाशिकसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

मुंबई, पुणे, कोकण, नाशिकमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. हवामान विभागाने आज प्रमाणे उद्यासाठीही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे,रत्नागिरीसह पालघरमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; दोन दिवस नागरिकांनो घराबाहेर पडू नका, CM फडणवीसांचे आवाहन

पालघर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचीशक्यता. जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अध्यादेश काढत जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी याचे आदेश दिलेत. पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं नागरिकांना सतर्कतेचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोठी बातमी! किल्ले, धरणं, धबधबे सर्व पर्यटकस्थळं बंद; ठाणे प्रशासनाचा मोठा निर्णय

प्रादेशिक हवामान विभागाच्यापूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्ट्या

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी सु्ट्टीचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या म्हणजेच मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तीव्र शक्यता आहे. जिल्ह्यात आधीच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील 'जगबुडी' नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.