IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार, तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल
Tv9 Marathi July 08, 2026 04:45 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल गेली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चौथा पराभव सहन करावा लागला आहे. संघाची धुरा हाती घेतल्यापासून टीम इंडिया पराभवाचं तोंड पाहात आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2ने गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही हाराकिरी सुरूच आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खूपच महत्त्वाचा होता. हा सामना गमावल्याने आता मालिका गमवण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं. मात्र हा निर्णय देखील चुकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर पराभव निश्चित झाला. या पराभवानंतर इंग्लंडने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे भारत ही मालिका जिंकणार तर नाही. पण मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

भारताचा डाव

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना भारताने पावरप्ले मधेच नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र दोघंही फेल गेले. इतकंच काय तर मधल्या फळीची कमकुवत फलंदाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अभिषेक शर्मा 10 आणि वैभव सूर्यवंशी 13 धावा करून बाद झाले. भारताने पावरप्लेच्या 6 षटकात पाच गडी गमवून फक्त 54 धावा केल्या होत्या. त्यामुळे पराभव हा निश्चित झाला होता. इशान किशन 13. श्रेयस अय्यर 5, अक्षर पटेल 10, तिलक वर्मा 3, हार्षित राणा 9, शिवम दुबे 2, अर्शदीप सिंग 4, वरुण चक्रवर्ती 5 धावा करून बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 76 धावांवर बाद झाला. यासह भारताने हा सामना 125 धावांनी गमावला.

इंग्लंडकडून जोश टंगने भेदक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 28 धावा देत 4 गडी बाद केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 3 षटकात 29 धावा देत 3 गडी बाद केले. तर अदिल राशीद 2.4 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले. तर विल जॅक्सने 2 षटकात 5 धावा देत 1 गडी बाद केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.