छत्रपती संभाजीनगर: अंधारी येथील गुरुकुल शाळेतील १६ विद्यार्थिनींना ‘नूडल्स’ खाल्ल्यानंतर मळमळ आणि अपचनाचा त्रास झाल्याने त्यांना शुक्रवारी रात्री खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोणत्याही प्रकारची गंभीर विषबाधेची लक्षणे आढळून आलेली नाहीत, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.
विद्यार्थिनींनी ‘इन्स्टंट नूडल्स’ तयार करून खाल्ल्या होत्या. त्यानंतर काहींना अपचनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थिनींना घाटी रुग्णालयात दाखल केले. यापैकी १० विद्यार्थिनींवर ‘मेडिसिन विभागा’त, तर सहा विद्यार्थिनींवर बालरोग विभागात उपचार करण्यात आले.