राज्यातील पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले असून, सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, सम्यक विद्यार्थी संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनातील प्रत्येक मागणीला लेखी उत्तर देण्यात आले आहे. आजच्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले असून, भविष्यात परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
पेपरफुटी प्रकरणाबाबत माहिती देताना दादा भुसे म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत सात ते आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक (SIT) राज्यातील विविध ठिकाणी तपास आणि कारवाई करत असून, या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन संबंधित प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सम्यक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोराडे यांनी सांगितले की, पेपरफुटीनंतर राज्यभरात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर पहिली बैठक झाली होती, मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. त्यानंतर सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
प्रशांत बोराडे म्हणाले की, आज शिक्षणमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. बैठकीत अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला असून, उर्वरित प्रश्न वरिष्ठ स्तरावर सोडवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी आणि पेपरफुटी प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता विद्यार्थी आणि राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.