Monsoon Rain Update 2026: महाराष्ट्रात विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. उपग्रह छायाचित्रांनुसार, उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून अत्यंत सक्रिय स्थितीत असून संपूर्ण महाराष्ट्रावरही ढगांची दाट गर्दी पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील किनारी भाग आणि लगतच्या घाट परिसरात पुढील 2 ते 3 दिवस वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर कायम राहील. पुढील 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम, तर विदर्भात काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो.
हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. साताऱ्याच्या घाट क्षेत्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्याचा घाट भाग येथे जोरदार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, तर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली येथे मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
20 जुलै रोजी पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट भागात पावसाचा 'यलो अलर्ट' कायम असणार आहे. याशिवाय जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात हायअलर्ट, पुढील पाच दिवस कसे?