नवी दिल्ली : NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत महत्त्वाचे आणि पॉवरफुल मंत्री मानले जात होते. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात जे काम विरोधी पक्षांना जमलं नाही, ते काम 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनानं करून दाखवलं आहे.
यापूर्वीही देशात अनेक मोठी आंदोलनं झाली, ज्यामध्ये शेतकरी आंदोलन हे सर्वात मोठे मानले जात होते. त्याशिवाय अनेक विविध मुद्द्यांवरून आंदोलने झाल, मात्र मोदी सरकारच्या कार्यकाळात एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नव्हता. सरकारने यापूर्वी नेहमीच विविध मार्ग काढून आणि राजकीय ताकदीचा वापर करून परिस्थिती हाताळली होती. मात्र, यावेळी सीपीजे (CPJ) आणि विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनामुळे सरकारवर एवढा प्रचंड दबाव आला की, मोदी सरकारच्या 12 वर्षांत आंदोलनामुळे पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे.
सीपीजेच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. हे आंदोलन केवळ दिल्लीच्या जंतर-मंतरपुरते मर्यादित न राहता मुंबई, कोलकाता, पुणे आणि देशातील इतर सर्व प्रमुख शहरांमध्ये वेगाने पसरले. या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम, रील्स आणि मीम्सच्या माध्यमातून सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर. या डिजिटल क्रांतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी सरकारला पूर्णपणे नामोहरम केले.
20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष अधिकच भडकला आणि आंदोलन आणखी तीव्र झाले. यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते, मात्र सीपीजेच्या अभिजित दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर या जनआक्रोशापुढे सरकारला झुकावं लागलं.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा थेट पंतप्रधानांकडे सुपूर्द केला असून, राजीनाम्याचे पत्र स्वतः माध्यमांना पाठवून दिले आहे. सीपीजेच्या आंदोलनाला मिळालेल्या या ऐतिहासिक यशानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष साजरा केला आहे.
ही बातमी वाचा: