‘जेन झी’नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Marathi July 25, 2026 09:25 PM

मुंबई : भाजप ज्यावेळी विरोधी पक्षात होता त्यावेळी रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला जायचा. आता एवढ्या वेळा पेपर फुटूनही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घेतला जात नव्हता. त्यामुळेच तरुणांच्या रागाचा उद्रेक झाला आणि आता शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. एका वाक्यात सांगायचं तर या जेन झी (Gen Z) नी सरकारच्या झिंज्या उपटल्या, असं राज ठाकरे म्हणाले. त्याचसोबत तरुणांचा हा राग आता प्रधानांवरुन पंतप्रधानांवर गेल्याचाही राज ठाकरेंनी दावा केला.

Raj Thackeray MNS shivsena Shivaji Park Rally : शिवाजी पार्कवर विजयाचा जल्लोष

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या या सरकारला अखेर माघार घ्यावीच लागली. हा देशातील संपूर्ण तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. उद्या शिवाजी पार्क मैदानावर, वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ उभारण्यात येईल आणि तिथेच सर्वजण जमतील. या ऐतिहासिक विजयाचा आणि तरुणाईच्या ताकदीचा जल्लोष होणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणूनच उद्या शिवाजी पार्कवर सर्व तरुण एकत्र येतील आणि हे आंदोलन अभिनंदन सभेच्या स्वरूपात साजरे केले जाईल.

Abhijit Dipke CPJ Support : ‘दिपकेंचा मोठा वाटा, त्यांचा निर्णय मान्य’

या संपूर्ण आंदोलनात आणि मिळालेल्या यशात अभिजित दीपके यांचा खूप मोठा वाटा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यापुढे अभिजित दीपके जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल. कारण त्यांनीच या लढ्याची खरी सुरुवात केली होती आणि त्यांना देशभरातील तरुणाईचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस नक्की कोणत्या कारणासाठी दिल्लीला गेले आहेत, याबद्दल आपल्याला सध्या कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

NEET Paper Leak Student Deaths : आधीच राजीनामा घ्यायला हवा होता

भाजप विरोधी पक्षात असताना रेल्वे अपघातावेळी रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागितला जायचा. रेल्वे अपघाताच्या वेळी रेल्वेमंत्री काय ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो का? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले की, नीटचा (NEET) पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. या संपूर्ण प्रकारात तब्बल 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2016-17 च्या सुमारास मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोललो होतो आणि सांगितले होते की, आज जसे शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतील. दुर्दैवाने आज तीच परिस्थिती समोर आली आहे. शिक्षणमंत्र्यांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता, एवढे प्रकरण ताणायची काहीच गरज नव्हती.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.