धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
राजू सोनावणे July 26, 2026 07:43 PM

Harshvardhan Sapkal on Nitin Gadkari : नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान ( Dharmendra Pradhan)  यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal )यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari )  यांच्यावर टीका केली. सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे, असे सपकाळ म्हणाले.

नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा 

एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळं या देशामध्ये एक मोठा स्कँडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळं मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी दिली. 

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापले

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता कॉकरोच जनता पार्टीचा पुढचा निशाणा कोण असणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ‘तिरंगा’ रॅलीत केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख “खड्डामंत्री” असा केला

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरात विद्यार्थी आंदोलकांकडून एकाच जल्लोष करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंकडून तिरंगा रॅलीचे आयोजन आज  करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख करत त्यांना सुरुवातीला “खड्डामंत्री” असे संबोधले. त्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करत “केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी” असा उल्लेख केला. त्याचवेळी इथेनॉलच्या मुद्द्यावर पुढील काळात मोठी चर्चा होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.