Water Bottle Smell Problem : जिम, ऑफिस किंवा प्रवासादरम्यान आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या किंवा इतर पाण्याच्या बाटल्यांमधून अनेकदा एक विचित्र आणि उग्र वास येऊ लागतो. रोज साबणाने किंवा पाण्याने बाटली धुतल्यानंतरही दमटपणा किंवा प्लास्टिकचा वास कायम राहतो. आपण सहसा याला स्वच्छतेची कमतरता मानतो, पण तज्ज्ञांच्या मते यामागे एक वैज्ञानिक आणि रासायनिक कारण आहे. बाटलीच्या झाकणामध्ये होणारी रासायनिक प्रक्रिया आणि त्यात अडकून राहिलेला दमटपणा यासाठी कारणीभूत ठरतो.
तज्ज्ञांच्या मते, बाटलीच्या झाकणाच्या थ्रेड्स (धागे) आणि छोट्या-छोट्या खाचांमध्ये पाणी आणि दमटपणा अडकून राहतो. जेव्हा आपण बाटली धुतल्यानंतर ती पूर्णपणे सुकण्याआधीच झाकण लावून बंद करतो, तेव्हा आत असा वातावरणीय दाब निर्माण होतो ज्यामुळे प्लास्टिकचे घटक हळूहळू वितळू किंवा तुटू लागतात. हे केवळ घाणीमुळे होत नाही, तर वापरलेल्या प्लास्टिक साहित्याचे केमिकल डिकंपोझिशन (Chemical Decomposition) म्हणजेच रासायनिक विघटन झाल्यामुळे होते, जे थेट पाण्याच्या गुणवत्तेवर आणि चवीवर वाईट परिणाम करते.
बहुतांश पाण्याच्या बाटल्या या 'पॉलिइथिलीन' (Polyethylene) नावाच्या प्लास्टिक पदार्थापासून बनवलेल्या असतात. 'वॉटर रिसर्च'मध्ये (Water Research) प्रकाशित एका अभ्यासानुसार, हा पदार्थ प्रकाश आणि पाण्याच्या संपर्कात आल्यावर हळूहळू विघटित होऊ लागतो. या प्रक्रियेत काही सूक्ष्म रसायने तयार होतात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते आणि पाण्याची चव बिघडते. थोडासा प्रकाशही ही रासायनिक प्रक्रिया अधिक वेगवान करतो. याशिवाय झाकणाच्या भागात पाणी साचून राहिल्याने मायक्रोऑर्गॅनिझम (सूक्ष्मजीव) आणि ऑक्सिडेशनमुळे वासाची समस्या अधिक गंभीर बनते.
1. बाटली आणि झाकण वेगळे सुकवा : बाटली धुतल्यानंतर ती लगेच बंद करू नका. बाटली आणि तिचे झाकण पूर्णपणे सुकेपर्यंत वेगळे आणि उघडे ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहून दमटपणा पूर्णपणे निघून जाईल.
2. उन्हात ठेवणे टाळा : बाटली जास्त वेळ कडक उन्हात किंवा प्रकाशात ठेवू नका, कारण उष्णतेमुळे रासायनिक विघटनाचा वेग वाढतो.
3. पूर्णपणे स्वच्छता करा : जर बाटलीतून आधीच तीव्र वास येत असेल, तर कोमट पाण्यात लिंबू, बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर घालून ती काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर व्यवस्थित धुवून वाळवा.
ही बातमी वाचा: