राज्यात MHT-CET परीक्षेच्या निकालावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेत्यांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांच्या बारावी, JEE आणि MHT-CET गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी बारावीत 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये 90 ते 100 पर्सेंटाईल कसे मिळाले, असा सवाल उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, नांदेडमधील भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांच्या निकालावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे बालाजी गाढे यांनी अवनी आणि आरुष नेरळकर यांना MHT-CET मध्ये 99 पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा केला. तसेच बारावीच्या PCM गटात त्यांना अनुक्रमे 56 आणि 51 टक्के, तर JEE मध्ये 51 आणि 28 टक्के गुण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या गुणांतील तफावतीमुळे संशय निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, या आरोपांवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमांनी संपर्क साधला असता आशिष नेरळकर यांनी बोलण्यास नकार दिला असं सांगितलं जात आहे. या प्रकरणावर संबंधित यंत्रणांची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.