मुंबई : शनिवारी मुंबईतील भुलेश्वर राजा गणेश मंडळाच्या (Bhuleshwar Ganesh) आगमन मिरवणुकीत 22 फुटाची गणेश मूर्ती कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत. मुंबईतील गणेश मंडळांमध्ये पीओपी गणेश मूर्तीच्या उंचीची एक प्रकारे स्पर्धा लागली आहे. यावर कुठलेही निर्बंध नाहीत, कुठलाही नियम नाही. त्यामुळे अगदी 30 ते 40 फुटापर्यंत गणेश मूर्ती गणेश मंडळांकडून विराजमान केल्या जात आहेत आणि याच मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेमुळे अशा घटना पाहायला मिळत आहे.
मुंबईचा खेतवाडीचा परिसर असेल किंवा मग लालबाग परळचा परिसर, यामधील अनेक मोठी गणेश मंडळांमध्ये 20 फुटापासून ते 30 फुटापर्यंत... अगदी 40 फुटापर्यंत गणेश मूर्ती विराजमान झालेल्या पाहायला मिळत आहेत. गणेश मंडळांमध्ये उंच गणेश मूर्तीची एक प्रकारे स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशा उंच गणेश मूर्तीच्या आगमनाच्या वेळी त्यासोबत विसर्जनाच्या वेळी मोठी कसरत आणि खबरदारी गणेश मंडळांना आणि प्रशासनांना घ्यावी लागते. समुद्रात विसर्जनाच्या वेळी सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र ही गणेश मूर्तींच्या उंचीची स्पर्धा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी भुलेश्वर सारख्या घटना (Bhuleshwarcha Raja) मुंबई विविध ठिकाणी घडलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामध्ये अंधेरीच्या प्रसिद्ध गणेश मंडळाची मूर्ती समुद्रात कलंडली होती. त्यावेळी काही जण जखमी झाले होत., लालबाग गणेश टॉकीज जवळही अशाच प्रकारे एक गणेश मूर्ती पडली होती. गिरगावच्या महाराजाची सुद्धा 2008 मध्ये चौपाटीवर गणेश मूर्ती पडली होती, त्यामध्ये चार जण जखमी झाले होते. त्यामुळे गणेश मंडळाकडून विशेष खबरदारी घेऊन सुद्धा अशा घटना घडताना पाहायला मिळत आहेत.
उंच गणेश मूर्तीचे गणेश मंडळांना त्यासोबतच भाविकांना आकर्षण हे मागील काही वर्षांपासून जरी वाढत चालला असलं तरी विराजमान करताना आगमन मिरवणुकीत आणि विसर्जन करताना विसर्जन मिरवणूक त्याची योग्य खबरदारी घेणं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ गणेश मंडळांकडे असणे आवश्यक आहे. मात्र जर खऱ्या अर्थानं अशा घटना टाळायच्या असतील तर गणेश मूर्तीच्या उंची संदर्भात ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
ही बातमी वाचा: