नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
परशराम पाटील, एबीपी माझा August 27, 2026 01:13 PM

Nepal Flash Flood: नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे 168 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 165 नेपाळमध्ये आणि 3 तिबेटमध्ये होते. 1,100 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्यांमध्ये 466 परदेशी आणि 113 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये 105 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. चीनच्या अधिकृत वेबसाइट CCTV नुसार, तिबेटमध्ये 550 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध मदत आणि बचाव पथके घेत आहेत. नेपाळी सैन्याने आज सकाळी रसुवा येथील तिमुरेमधून 116 लोकांना वाचवले. यामध्ये 95 नेपाळी आणि 21 भारतीयांचा समावेश आहे.

भूस्खलनामुळे भूकंपासारखा कंप निर्माण झाला

बुधवारी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी नेपाळ-चीन सीमेजवळ, काठमांडूच्या उत्तरेला जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. सुरुवातीला, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने हा 4.4 तीव्रतेचा भूकंप असल्याचे सांगितले. या दरम्यान, बर्फ आणि खडकांसह पर्वताचा एक मोठा भाग कोसळून ल्हेंडे खोला नदीत पडला. ही नदी भोटेकोशी नदीची उपनदी आहे, जी चीनमध्ये उगम पावते आणि खोल दऱ्यांमधून नेपाळमध्ये प्रवेश करते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हिमनदीचा एक मोठा भाग पर्वतापासून तुटून खाली पडला असावा. तथापि, या घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी अनेक आठवडे लागू शकतात. नंतर, यूएसजीएसने स्पष्ट केले की तो भूकंप नव्हता. भूस्खलन इतके शक्तिशाली होते की त्यामुळे 5.2 तीव्रतेच्या भूकंपासारखा कंप निर्माण झाला. याचा अर्थ असा की, भूकंप झाला नव्हता, तर भूस्खलनामुळे भूकंपासारखा कंप निर्माण झाला होता.

भारतात याचा परिणाम कुठे आणि किती होईल?

भारतात, याचा परिणाम प्रामुख्याने बिहारमधील गंडक नदी आणि तिच्याशी संबंधित लहान-मोठ्या नद्यांवर अपेक्षित आहे. नेपाळमधून सुमारे 3 मीटर उंचीच्या पुराच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली येथे विशेष दक्षता ठेवण्यात येत आहे. सीतामढी आणि शिवहारवरही लक्ष ठेवून आहेत. नेपाळमधील पाणी त्रिशुली नदीमार्गे गंडक नदीत पोहोचेल. यामुळे खालच्या बिहारमधील पाण्याची पातळी वाढू शकते. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर येथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नेपाळमधील ही घटना केदारनाथ दुर्घटनेसारखीच

हिमनदीच्या पाण्याने भरलेल्या चोराबाडी सरोवरामुळे 2013 च्या केदारनाथ दुर्घटनेतही विध्वंस झाला होता. 15-16 जून रोजी मुसळधार पाऊस झाला आणि 16 जून रोजी सायंकाळी 5.15 च्या सुमारास पहिला मोठा पूर आला. त्यानंतर, 17 जून 2013 रोजी सकाळी पावणे सात वाजता, चोराबाडी ताल येथील नैसर्गिक हिमनदी-निर्मित धरण फुटले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी, खडक आणि ढिगारा वाहून गेला. यामुळे केदारनाथ, गौरीकुंड आणि सोनप्रयाग यांसारख्या आसपासच्या भागांमध्ये प्रचंड विध्वंस झाला. सरकारी अंदाजानुसार, 2013 च्या उत्तराखंड आपत्तीमध्ये 580 लोकांचा मृत्यू झाला, 4,473 लोक जखमी झाले आणि 5,526 हून अधिक लोक बेपत्ता झाले. सध्याच्या नेपाळमधील दुर्घटनेतही अशीच एक घटना घडल्याचे वृत्त आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.