Maharashtra Rain News : राज्यात कमी झालेला पावसाचा जोर (Heavy Rain) आजपासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कुठं ऑरेंज (Orange alert) तर कुठं यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज हवामान विभागानं (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामान विभागाचा अंदाज.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलरक्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेशपुजनाला 100 टक्के भरलं आहे. त्यामुळं मराठवाड्याची तहान आता भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणं आता भरत आली असली तरी राज्याच्या तुलनेत 65.35 टक्के धरणं भरली आहेत.