बुमराहने गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालला नाचवलं, विराट कोहली मदतीसाठी धावला
GH News September 17, 2024 01:08 AM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन दिवसांनी पहिला कसोटा सामना सुरु होईल. या सामन्यासाठी संघात निवडलेले सर्व खेळाडू सराव करत आहे. या सरावात यशस्वी जयस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. कारण सरावातही त्याला लय सापडताना दिसली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. सोमवारी झालेल्या सराव शिबिरात जसप्रीत बुमराहने यशस्वी जयस्वालला सळो की पळो करून सोडलं. रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहच नाही इतर गोलंदाजानीही त्याला अडचणीत आणलं. त्याची अडचण पाहून विराट कोहली मदतीसाठी पुढे सरसावला. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह आणि इतर वेगवान गोलंदाजांनी यशस्वी जयस्वाल सोबत नेट प्रॅक्टिस केली. सराव लाल मातीच्या विकेटवर सुरु होता. ही खेळपट्टी खासकरून वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्याचा पुरेपूर फायदा बुमराहने घेतला. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालची फलंदाजी करताना चांगलीच दमछाक झाली. बुमराहने ऑफ स्टंपबाहेर चेंडू टाकत त्याला चकवा देत होता. तसेच दोनदा त्रिफळा उडवला. इतकंच काय तर सिमरजीत सिंह, गुरनूर बराड आणि गुरजनप्रीत सिंहने जयस्वालला चकवलं.

विराट कोहली बाजूच्याच नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. त्याची नजर यशस्वीच्या फलंदाजीकडे जात होती. यशस्वी जयस्वालची अडचण पाहून विराट कोहलीने लगेचच त्याच्याशी बोलला. नेमकं काय चुकतंय ते सांगितलं. आता विराट कोहलीचा सल्ला यशस्वीच्या किती कामी येतो हे लवकरच दिसेल.खरं सांगायचं तर यशस्वी जयस्वालकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.  त्याची विकेट बांगलादेशला लवकर मिळाली तर अडचणीचं ठरू शकतं. कारण एकदा बांगलादेशला पिक मिळाला तर त्याचा फायदा घेऊ शकतात.

विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालने एक तास बॅटिंगचा सराव केला. दोघेही जवळपास 50 चेंडू खेळले. यात जमेची बाजू म्हणजे यशस्वी जयस्वालने फिरकीपटूंचा जबरदस्त सामना केला. ऑफ साइडला चांगली फटकेबाजी केली. यशस्वी जयस्वालचा फॉर्म परत आला तर टीम इंडियाला पुढच्या सर्वच सामन्यातील टेन्शन निघून जाईल. दुसरीकडे, यशस्वी जयस्वाल दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळला होता. पण तिथेही काही खास करू शकला नाही. इंडिया बी संघासाठी त्याने पहिल्या डावात 30 आणि दुसऱ्या डावात 9 धावा केल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.