विराट कोहली नॉट आऊट होता, तरीही रिव्ह्यू घेतला नाही; कर्णधार-अंपायर सगळेच हैराण
Marathi September 20, 2024 10:25 PM

चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा केल्या. भारतीय संघाकडे सध्या 308 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि अनुभवी विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहलीसाठी हा कसोटी सामना निराशाजनक राहिला. कोहलीनं पहिल्या डावात अवघ्या 6 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो 17 धावा करून बाद झाला. विराट कोहली दुसऱ्या डावात ज्या पद्धतीनं बाद झाला, ते आता चर्चेचा विषय बनलं आहे.

विराट कोहली दुसऱ्या डावात मेहंदी हसन मिराजच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला होता. मिराजचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडला लागला. त्यानंतर अंपायरनं त्याला बाद घोषित केलं. कोहलीनं नॉन स्ट्रायकर शुबमन गिलशी संवाद साधला, परंतु रिव्ह्यू घेतला नाही. मात्र, विराट कोहली जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा रिप्लेमध्ये तो नाबाद असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. कारण चेंडू कोहलीच्या पॅडला लागण्यापूर्वी त्याच्या बॅटला लागला होता. परंतु त्याला आणि गिलला याची कल्पना आली नाही. जर येथे विराटनं रिव्ह्यू घेतला असता, तर तो नाबाद राहिला असता.

हा रिप्ले समोर आल्यानंतर ड्रेसिंग रुममधील भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. रिप्ले पाहिल्यानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कालच्या धावसंख्येत 37 धावांची भर घालून भारतीय संघ 376 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, बांगलादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल फेल पडले. संघ अवघ्या 149 धावांवर ऑलआऊट झाला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनशिवाय एकही फलंदाज 30 धावांचा आकडा गाठू शकला नाही. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

हेही वाचा –

IND vs BAN: बांगलादेशविरूद्धच्या दोन्ही डावात कर्णधार रोहित शर्मा फ्लाॅप!
चेन्नई कसोटीवर भारताची मजबूत पकड, दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावे
आकाश दीपच्या वेगानं बांगलादेशी फलंदाज हादरले, प्रशिक्षक मोर्ने मॉर्केलची प्रतिक्रिया व्हायरल


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.