जर तुम्ही मधुमेहासारख्या सायलेंट आजाराची शिकार असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावर या पानांना तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवू शकता. आयुर्वेदानुसार, ही पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. तुम्हाला या पानांची माहिती आहे का ? या पानांना ‘मीठा नीम’ म्हणजेच ‘गोड कडुलिंब’ या नावानेही ओळखलं जातं. या पानांमध्ये असणाऱ्या पौष्टिक तत्त्वांमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याला एका विशिष्ट मर्यादेसाठी सुधारू शकता. ही पानं म्हणजेच दुसरीतिसरी कुठलीही पानं नसून कढीपत्त्याची पानं आहेत. जर तुम्हालाही असं वाटत असेल की कढीपत्त्यांचा वापर हा केवळ खाण्याचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो तर हा तुमचा गैरसमज आहे. जाणून घेऊयात कढीपत्त्यांच्या काही कमाल फायद्यांबद्दल.
कढीपत्त्याची केवळ 10 पानं सकाळी चावून खाल्ली पाहिजेत. तुम्ही हा नियम जर रोजच्या रोज पाळलात तर तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवू शकाल. याव्यतिरिक्त या पानांमध्ये असलेल्या पौष्टिक तत्त्वांमुळे तुमचे आरोग्यदेखील सुधारू शकेल. अतिसार किंवा उलटीची समस्या रोखण्यासाठी कढीपत्ता खाण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्ही मुखदुर्गंधीपासून सुटका मिळवू इच्छित असाल तर 2- 4 कढीपत्ते चावून खाणे सुरू करा. एवढंच नव्हे तर पानांचा काढा बनवून ओरल हेल्थच्या समस्येला तुम्ही दूर करू शकता. रोज सकाळी जवळपास एक चमचा कढीपत्त्याचा रस प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होऊ शकते.
कढीपत्त्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस्, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, कॅल्शियम, आयर्न आणि फॉस्फरससारखी पोषकतत्त्व चांगल्या प्रमाणात असतात. जी तुमच्या तब्येतीला मजबूत ठेवू शकतात. असं जरी असलं तरी चांगल्या परिणामांकरता कढीपत्त्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केले पाहिजे. अन्यथा शरीराला कढीपत्त्यांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. याकरताच कढीपत्त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
संपादन- तन्वी गुंडये