‘देवगिरी’वर मध्यरात्री खलबतं, अजितदादांवर नेत्यांचा दबाव; कोणती केली मागणी?
GH News September 24, 2024 01:13 PM

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात मोठी खलबंत होत आहेत. अजित पवारांकडून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठकही पार पडली.

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार गटाकडून संपूर्ण 288 मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यात सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद किती याची चाचपणी केली गेली.

राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी यावेळी विधासभेच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. यावेळी या नेत्यांनी विधानसभेबद्दल याच आठवड्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी अजित पवारांकडे केली. याआधीही अजित पवारांच्या पक्षाकडून राज्यातील सगळ्या मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली होती. त्यामुळे आता अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? स्वबळावर निवडणूक लढणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

“अजित पवार गटाने बाहेर पडावे यासाठी प्रयत्न सुरु”

दरम्यान अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यूह रचण्यात येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकासआघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी यावर मोठे वक्तव्य केले. “महायुतीत महाभारत चाललं आहे, हे मी गेल्या सहा महिन्यांपासून सांगत आहे. आता पुढे काय काय होतं ते तुम्ही फक्त बघत बसा”, असे नाना पटोले म्हणाले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.