Aishwarya Narkar-Avinash Narkar : मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून (Central Government) घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठी माणसाची असलेली इच्छा आता पूर्ण झाली आहे. तसेच या निर्णयावर राजकीय, सामाजिक, कला या सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, 'मराठी भाषेच्या आजवरच्या प्रवासातला सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवावा असा हा आजचा दिवस. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे त्रिवार आभार. अख्खा महाराष्ट्र या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'या यशामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांचे खूप आभार.आपल्या मराठी भाषेला आईचा दर्जा देणारे आम्ही मराठी, आज मराठी भाषेला मिळालेल्या या दर्जाबद्दल आजचा हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करु. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचे अभिनंदन..'
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.