पिंपरी, ता. ५ ः शहरातील पूरग्रस्त मदत न मिळाल्याबद्दल आंबेडकर कॅालनी, रमाईनगर, भाटनगर, बौद्धनगर, संजय गांधीनगर, रिव्हर रोड जवळील पूरग्रस्तांना पिंपरीतील तलाठी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शहरातील पूरग्रस्तांच्या बँक खात्यात तातडीची मदत अद्याप जमा झालेली नाही. सरकारने मदत करण्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर एक महिना उलटून गेला तरी अजूनही पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळालेली नाही. स्थानिक नेत्यांनी पाहणी केली. मात्र, यातून पूरग्रस्तांच्या हाती काहीच लागले नाही.
शहरात अतिवृष्टीला सुरुवात झाली. कमी कालावधीत पडलेला प्रचंड पाऊस झाल्याने शहरावर महापुराचे संकट आले होते. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने पूरस्थिती भयावह झाली. शेकडो लोकांचे स्थलांतर करावे लागले. लोकांना पुराचा फटका बसला. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे एटीएम कार्ड, पासबुक पुरात वाहून गेले आहेत. सरकारकडून मदतीत होणाऱ्या दिरंगाईबद्दल पूरग्रस्तांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या आंदोलनात सागर कसबे, पप्पू पवार, पप्पू कांबळे, संकेत वाघमारे, अभि कसबे, भरत मीरपगार आदींनी सहभाग घेतला.