Nana Patole on Akola Incident: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यामध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. क्षुल्लक कारणांवरून दोन गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात जमावाने जाळपोळही केली आहे. तसेच जमावाकडून चारचाकी वाहनांचं नुकसानही करण्यात आले आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यानंतर या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. आता यावर कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवलं आहे.
नाना पटोले म्हणाले, ज्याच्या जवळ पैसे नाहीत ते कटोरे घेऊन फिरत आहेत. पैसे नाहीत आणि महामंडळ जाहीर करतात. यांना बॅंका पैसे द्यायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या संपत्त्या हे विकत आहेत. मोदींच्या मित्राला ते देत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निर्णय थांबवू. जे निर्णय चांगले असतील त्याचं समर्थन करु पण जे महाराष्ट्राच्या विरोधात असतील ते थांबवू, अशी ग्वाही नाना पटोलेंनी दिली आहे.
आज अकोल्यात लाठीचार्ज झाला. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, हे महाराष्ट्रात चालत राहणार. जिकडे हिंदू मुस्लिम भाईचाराने राहतात, तिकडे हे सत्ताधारी असं करणार. हे जाणूनबुजून हे सरकार करत आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्हाला भूतकाळात जायचं नाही आहे. आज राज्याची जी अवस्था आहे ती आपण बघतोय. राज्य कर्जबाजारी झाले आहे. महाराष्ट्र वाचवणे हे जनतेची जबाबदारी आहे. योजनेचं प्रमोशन करण्यासाठी खर्च हे क्लेषदायक आहे. महागाई एवढी वाढत आहे. किराणा सामानात वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसात सामान्य माणसाने सण साजरे करु नये हे सरकारचे स्वप्न असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.