Ratan Tata Passes Away: उद्योगसूर्याचा अस्त! रतन टाटा यांचं निधन, राज्यात दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
Times Now Marathi October 10, 2024 09:45 PM

Maharashtra Government on Ratan Tata: प्रख्यात उद्योगपती, समाजसेवी आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राज्यात आज म्हणजेच गुरुवार 10 रोजी एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच पद्मविभूषण रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यांना श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहणार आहे. दुखवटाच्या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

मुंबईतील कार्यक्रम रद्द

रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यात आज दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, आज मुंबईसह राज्यातील शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. आज राज्य शासनाचे मुंबईत अनेक कार्यक्रम नियोजित होते. मात्र या दुःखद घटनेनंतर, सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेले हे कार्यक्रम उद्या घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दुर्मिळ रत्न हरपले : मुख्यमंत्री

सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, रतन टाटा यांच्या रुपाने दुर्मिळ रत्न हरपले. नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे 150 वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.



स्व. रतन टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. 1991 मध्ये रतन टाटा समूहाचे ते अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. 2008 च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा कायम स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील, असेही मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एनसीपीएमध्ये घेता येणार दर्शन

रतन टाटा यांच्या पार्थिवाचे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटे या वेळेत दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी पार्थिव एनसीपीएमध्ये ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती देत दर्शनासाठी येणाऱ्यांना आवाहन करत, या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे. पार्किंगची व्यवस्था पाहूनच यावे. या ठिकाणी पोलिस पूर्णपणे तैनात असतील, असे सांगितले.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.