महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांच्या जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व? वर्ध्यात महायुती की मविआ, कोण बाजी मारणार?
एकनाथ चौधरी October 21, 2024 08:13 PM

Wardha Vidhan Sabha Election 2024 वर्धा : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha) घोषणा झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा एकला चलो रे चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit bahujan aghadi) विधानसभा उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. 

असे असले तरी लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मविआला 30 जागा मिळाल्या. भाजप, शिवसेना आणि  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं  17 जागा मिळवल्या. सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. तर एकट्या विदर्भातील 10 जागांपैकी केवळ 2 जागा महायुतीला मिळाल्या. परिणामी, महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसने विदर्भात मुसंडी मारत घरवापसी केली आहे. त्यामुळेच जागा वाटपात विदर्भाच्या जागेवरून  मविआत रस्सीखेच झाल्याचेही बघायला मिळाले आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राज्यातील मतदार कुणाला कौल देतात ते पाहावं लागेल. 

दरम्यान, राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस गेल्या लोकसभेला तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली.

परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळवली आणि विजयही! ऐकूनात विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधनसभा निवडणुकीला नेमकं कुणाची हवा असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघात सध्या आमदार कोण? हे जाणून घ्या सविस्तर.

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व?

विधानसभा निवडणुक उंबरठ्यावर असताना महाविकास आघाडीत आणि महायुतीमध्ये उमेदवारी कुणाला? या प्रश्नावर सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते आहे. महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याने यावेळी वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच यावेळी आघाडीकडे मित्र पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग आहे. तर महायुती मध्ये देखील उमेदवारी साठी इच्छुक दबक्या आवाजात इच्छा व्यक्त करीत होते. मात्र भाजपने आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार जाहीर करत  तीन पैकी दोन विद्यमान आमदारांना भाजपने जैसे थे ठेवत पुन्हा संधी दिली आहे.  

वर्ध्याच्या चार पैकी तीन जागांवर भाजपचे उमेदवार

महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली केलीय. या यादीमध्ये वर्ध्यातील देवळी, वर्धा आणि हिंगणघाट या तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. देवळी येथून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यात विद्यमान आमदार पंकज भोयर आणि हिंगणघाट येथे विद्यमान आमदार समीर कुणावार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या वर्ध्यातील तीन जागावर उमेदवारी जाहीर झाल्यावर आता आर्वी येथे नेमका कोणता चेहरा महायुतीकडून  जाहीर केला जातो हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून कुणाची वर्णी?

वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत काँग्रेसचे शेखर शेंडे, अभ्युदय मेघे आणि डॉ.सचिन पावडे ही नावे चर्चेत आहे. तिन्ही इच्छुक उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली आहे. शेखर शेंडे हे तीनवेळा वर्धा विधानसभेत निवडणूक लढले. यात त्यांना अंतर्गत विरोधाने पराभव पत्करावा लागला. यावेळी शेंडे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांनी अलीकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी देखील उमेदवारीसाठी दावा केला आहे. गेल्या एक वर्षांपासून अभ्युदय मेघे हे मतदार संघात विविध कामातून सक्रिय आहे. आरोग्य क्षेत्रात नाव असलेले डॉ. सचिन पावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी जर मिळाली नाही तर आघाडीत बंडखोरी देखील होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रवक्ते नितेश कराळे आणि शिवसेनेच्या उबाठा गटाकडून नेहाल पांडे हे देखील लढण्यास इच्छुक आहे. महायुतीमध्ये आमदार पंकज भोयर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून वर्ध्यात आणखी कुणी उमेदवार समोर येऊ शकतो काय? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे महायुतीकडून माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी जाहीररीत्या उमेदवारी मिळाल्यास आपण लढणार असल्याचे संकेत दिले होते. तर खासदार विजय मुंडे यांच्या कन्या अर्चना मुंडे (वानखेडे )यांच्या नावाची देखील चर्चा होती. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून माजी जी.प.सदस्य राणा रणनवरे यांनी देखील तयारी चालविली आहे. त्यामुळे  वर्धा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.