अक्षय शिंदे
जालना : मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून आई- वडिलांनी तिला आणि तिच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधुन दोन महिने डांबून ठेवले होते. ही धक्कादायक घटना जालन्यातील भोकरदन शहराजवळील एका गावात उघडकीस आली. दरम्यान पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी मायलेकाची सुटका करत तिला पतीच्या ताब्यात दिले.
समाजात आंतरजातीय मान्य नाही. आई- वडिलांच्या विरोधात जाऊन मुलीने अथवा मुलाने आंतरजातीय विवाह केल्यास यातून बदल घेण्याच्या भावनेतून भयानक कृत्य घडत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसारच जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक घटना समोर आली आहे. मुलीने आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई- वडिलांनी तिला व तिच्या मुलाला साखळ दंड पायाला बांधुन दोन महिने डांबून ठेवल्याचे समोर आले आहे.
आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
शहरालगत असलेल्या एका गावातील एका मुलीने छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. यामुळे मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला साखळ दंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं.
न्यायालयाच्या आदेशानंतर मायलेकाची सुटका
दरम्यान आपल्या पत्नीला व मुलाला तिच्या आई- वडिलांनी डांबून ठेवत आपल्याकडे येण्यास विरोध करत आहेत. यामुळे पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे. विवाहिता आणि मुलाची सुटका करण्यात आली.