रामदास अथेले: संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
जम्मू काश्मीरमध्ये 99 टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात 370 कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे. मात्र भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमांच्या विरोधात नाही, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पहिल्यानंतर वाद समोर आला. मात्र शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव होते. सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे. आणि हा वाद जास्त वाढू नये, असे माझे मत आहे. संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब आंबेडकर जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असेही त्यांनी म्हटले.
उत्तर भारतीय विकास सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ले केले जात असल्याचा आरोप यात करण्यात आलाय. याबाबत विचारले असता रामदास आठवले म्हणाले की, मान्यता रद्द करू नये. मात्र, आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सर्वांना सावरण्याचे काम मुंबईने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जावू नये. ते दोन-तीनदा जाऊन आले आहेत. मुंबई बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम आहे. ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मनसेने विकासाबद्दल बोलले पाहिजे. दादागिरी करणे योग्य नाही. बँकांमध्ये अशा पद्धतीने मराठीचा आग्रह करणे चुकीचे आहे. राज ठाकरेंना देखील याबद्दल सद्बुद्धी येवो. अनावश्यक विषय समोर आणू नये राज ठाकरे यांनी लोकसभेला पाठिंबा दिला. मात्र, त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..