(Sanjay Raut) मुंबई : नाशिकमध्ये बुधवारी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण असेला एक व्हिडीओ दाखविण्यात आला. त्यात भाजपाबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरही टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे भाषण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘कृत्रिम’ आवाजाचा वापर केल्याबद्दल भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. तथापि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut: Raut criticizes BJP over Balasaheb Thackeray’s speech)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक बनावट संघटना तयार केली आणि या संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायला लावले. नंतर महाराष्ट्रात ती काही लोकांना चालवायला दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्यांनी बनावट शिवसेना तयार केली आहे, त्यांनी टीका करू नये, असे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटाला सुनावले आहे.
हेही वाचा – Shiv Sena Vs Shiv Sena : स्वार्थासाठी आता AIची मदत घ्यावी लागतेय, शीतल म्हात्रेंची ठाकरेंवर टीका
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाचा जो व्हिडीओ दाखवला तो पहिल्यांदाच दाखवलेला नाही. मुंबईत झालेल्या शिबिरातही असा प्रयोग आम्ही केला होता. त्यावेळी मात्र यांचे लक्ष गेले नाही, असे ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान पुढे गेले आहे. शिंदे गटाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत बोलताना आम्ही देश कसा पुढे नेत आहोत, ही भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. शिंदे गट आणि भाजपाने मोदी यांचे ऐकायला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी या लोकांचा काय संबंध? दुसरे म्हणजे, शेवटी हे विचार बाळासाहेबांचेच आहेत ना? त्यामुळ ते यांना बनावटच वाटणार, असे त्यांनी म्हटले आहे.
‘माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…’ हा बाळासाहेब ठाकरे यांचा धीरगंभीर आवाज नाशिकमधील ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात घुमला आणि उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष केला. एआयचा वापर करून एका व्हिडीओच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकविण्यात आले. या भाषणातून भाजपा तसेच शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली होती. ‘आपली शिवसेना व्यापाऱ्यांनी तोडली. संभाजी महाराजांसारखेच स्वकियांचे वार आपल्या नशिबात आले. परंतु घाबरू नका. गद्दारांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. शिवसेना संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ती संपणार नाही. तुमचे शंभर बाप खाली आले तरी शिवसेना संपणार नाही. अशा आव्हानांमधूनच शिवसैनिक पुढे जाईल, असा विश्वास निर्माण करतानाच, मी अजूनही तुमच्या सोबतच आहे…, असे भावनिक आवाहनही बाळासाहेबांच्या आवाजातून करण्यात आले.
हेही वाचा – BJP : मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर करू नका; बावनकुळेंचा उबाठावर निशाणा