Maharashtra News Live Updates: ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रविण गायकवाड यांची निवड
Saam TV April 19, 2025 05:45 PM
तीन हजार शिक्षकांचे अडले वेतन, शिक्षणाधिकारी नसल्याने सही करणार कोण ?

चंद्रपूर ब्रह्मपुरी, - पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे योजनेचे तीनतेरा वाजले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सतत सक्षम अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मात्र, अद्याप तांदळाचा पुरवठा झाला नाही. परिणामी विद्यार्थी आणि पालकांत असंतोष खदखदत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

- मंत्री नितेश राणे यांना कोंबड्याचे चित्र दाखवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

- मंत्री नितेश राणे यांना सार्वजनिक ठिकाणी कोंबड्याचे चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल

शिरपुरात पुन्हा एकदा महिला राज, सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीला; अनेकांचा स्वप्नभंग

शिरपूर जैन - जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन येथील २०२६ साठी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. शिरपूर सारख्या मोठ्या गावाची धुरा पुन्हा एकदा अनुसूचित जमातीच्या महिलेच्या वाट्याला जाण्यास असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा स्वप्नभंग झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण, ससून रुग्णालयाच्या समितीची आज पुन्हा बैठक

दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या समितीने पाठविलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होणार असून, अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे.

मानीफाटा राडा प्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल

अलिबाग रेवस मार्गावर अपघातानंतर झालेल्या राड्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबाग रेवस रस्त्यावर मानी फाटा येथे कारने दिलेल्या धडकेत मोटार सायकल वरून चाललेले विश्वास पाटील आणि कल्पना पाटील या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. दोन तास वाहतूक रोखून धरली तसेच अपघातग्रस्त कारची तोडफोड देखील केली होती. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

घाटंजीत पन्नास वर्षानंतर अनोखा विवाह, बंजारा समाजात परंपरेचा नवा जागर

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील वागदा येथे सुमारे 50 वर्षानंतर आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाह पार पडलाय.बंजारा समाजातील सुरज राठोड आणि मेनका चव्हाण यांनी पारंपारिक चालीरीतीनुसार विवाह केला.मंडव पूजन अग्नीपरिक्रमा पारंपारिक वेशभूषा ढोल वाद्यांच्या गजरात पार पडलेला सोळावा हा समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला व जुने पारंपरिक घागरा आणि गजरा परिधान केला तर वराने गोर पगडी व अंगरखा घातला हा विवाह सोहळा निसर्ग पूजन, संत सेवालाल महाराज यांचे पूजन व आशीर्वाद घेऊन करण्यात आला.

संत गोरोबा काका यांचा समाधी सोहळा

धाराशिव तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा काकांच्या 708 व्या वार्षिक संजीवन समाधी सोहळा 23 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे.या निमित्त तेर नगरीत तेरणा नदीच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरणार आहे. 23 एप्रिल रोजी राज्यभरातुन विविध साधु संत व महंताच्या वारकरी दिंड्या तेरमध्ये दाखल होणार आहेत पुढील ३० तारखेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

राजगुरुनगरला खळबळजनक घटना, अज्ञातांनी आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला

अज्ञात व्यक्तीने नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्यात आला असून, घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने आग घरातही आग लागली यावेळी राजगुरुनगर पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले असून, आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आलय गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही.अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतलीय

पुणे शहरातील रस्ता दुरुस्तीसाठी पुणे महानगरपालिका करणार १५ कोटी रुपयांचा खर्च

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मायक्रो सरफेसिंगची कामे करण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.यासाठी निविदा काढून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांवर म्हणजे साधारण तीन लाख ८० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मायक्रो सरफेसिंगची कामे पूर्ण करण्याचे नियोजन पथ विभागाने केले आहे.

Maharashtra News Live Updates: ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रविण गायकवाड यांची निवड

शिवचरित्रातून रामदास व दादोजी कोंडदेव हटावो,संभाजी ब्रिगेड एक अभ्यास,मराठा क्रांती मोर्चा आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले असून सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर ३ हजारांहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. ९ व १० मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड या ठिकाणी हे संमेलन संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार करणार आहेत.

महावितरणच्या पुणे परिमंडळाची घोडदौड, महसुलात दोन वर्षात पाच हजार कोटींपेक्षा जास्त वाढ

महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या दोन वर्षात 21 हजार 280 रुपयांवर गेला आहे. विविध उपक्रमांमुळे पुणे परिमंडळाच्या महसुलात दोन वर्षात पाच हजार 137 कोटी 55 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. अचूक देयके, वीज व वाणिज्य हानीत घट व चार लाख 34 हजार नव्या जोडण्यांमुळे पुणे परिमंडळाच्या महसुलात हि वाढ झाली आहे.

'पीएमपी'च्या १२३ नवीन बस सेवा संंचलनातून बंद

पीएमपीएमएल ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या असून, बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीने आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढत नव्याने आधुनिक बस घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १२३ सीएनजी बस घेण्यात आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.