माढा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मागील वेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले व नैसर्गिक युती वाटणारे सरकार सत्तेत आले होते. लाडकी बहीण सारख्या लोकाभिमुख योजना राबविल्यामुळेच पुन्हा युतीचे शासन आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माढ्यात सोमवारी (ता. २१) सांगितले. राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजचे भूमिपूजन उत्साहात झाले. त्यानंतर झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उद्योगमंत्री सावंत म्हणाले की राजवी ऑईल मिलमुळे परिसरात शेतकऱ्यांना फायदा होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या लाडकी बहीण सारख्या निर्णयामुळे महिलांना फायदा होत आहे.
यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पृथ्वीराज सावंत उभा करत असलेला हा प्रकल्प या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नही प्रा. शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. प्रा. सावंत यांच्या पाठीशी आम्ही सर्वजणच खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माढा दौरा नक्की होणार आहे.
यावेळी आमदार अभिजित पाटील, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह काही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आमदार नारायण पाटील, माजी आमदार धनाजीराव साठे, संजय शिंदे, राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजचे चेअरमन पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख मुन्ना साठे, कालिदास सावंत, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, दिग्विजय बागल, महंत श्री शिवरूपानंद स्वामीजी (सहमंत्री आखिल भारतीय संत समिती, कोकण प्रांत) अमर पाटील, विजय राऊत, किरण सावंत, संजय सावंत, झुंजार भांगे, दादासाहेब साठे, अशोक लुणावत, साईनाथ अभंगराव, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, बंडूनाना ढवळे, अरविंद खरात, स्वप्निल खरात, प्रवीण चवरे, अजिंक्य काटे आदी उपस्थित होते. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे हिने सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज सावंत यांनी आभार मानले.
‘शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आलो’उद्योगमंत्री उदय सामंत व पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीची बैठक असल्याने त्यांची इच्छा असूनही माढयातील या कार्यक्रमाला येता आले नाही. शिंदेसाहेबांचा आम्हा दोघांनाही आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राजवी ॲग्रोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले.
सावंतांकडून मुलाचे कौतुकमाळरानावर उद्योग उभारण्याचे धाडस पृथ्वीराज सावंत यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री सामंत, पर्यटनमंत्री देसाई यांचे कायम सहकार्य राहिले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी भविष्यातही या नेत्यांचे सहकार्य राहील असा विश्वासही प्रा. शिवाजी सावंत यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कामगार सेनेच्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी व व महिलांनी शिवसेना शिंदे गटात यावेळी प्रवेश केला. दोन्ही मंत्र्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.