(Pawar about Thackeray) पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मोठे बंधू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ठाकरे बंधू एकत्र आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटते, तो निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आता याबाबत टिप्पणी केली आहे. (Sharad Pawar’s reaction regarding the Thackeray brothers)
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी देण्याबद्दल राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी केला असता, राज ठाकरे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.’ याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti : शिक्षक गणवेशाच्या ‘टेंडरबाजीत’ दलाली खाण्याची स्पर्धा लागेल, ठाकरेंचा आरोप
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दोन्ही नेते एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कारण कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील, तर यात वाईट वाटायचे काहीच कारण नाही. पण मला वाटते की, माध्यमं या गोष्टीचा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे थोडी वाट बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू.
तर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे की नाही यावे? याबाबत आम्ही म्हणजेच दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचे काही कारण नाही. माझे मत एवढेच आहे की, प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून त्यांना जे जे योग्य वाटते तो निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
आता एनसीपी एसपीचे प्रमुख शरद पवार यांनीही पुणे येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना यावर टिप्पणी केली आहे. हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्याची मला माहिती नाही आणि मी काही त्यांच्याशी बोललो नाही. मग त्याविषयी कसे भाष्य करू, असा प्रश्न त्यांनी केला.
हेही वाचा – Congress : जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र तहानलेलाच; सपकाळ यांचा गंभीर आरोप