मुंबई : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात आज (22 एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुरुवातीला 2 पर्यटकांचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र आता 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने अशा दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू आणि काही पर्यटक जखमी असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis informed that two tourists from Maharashtra died in the Pahalgam terrorist attack)
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ज्या प्रकारे हा हल्ला केला गेला आणि नाव विचारून हत्या करणे हे खूप चुकीचे आहे. दहशतवादी हल्ला करून जम्मू-काश्मीरची जी विकास यात्रा सुरू आहे, तिला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण आम्ही दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की, जम्मू-काश्मीर आणि भारत कधीही थांबणार नाही. अशा शक्तींना संपवल्याशिवाय भारत आता शांत बसणार नाही.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची माहिती घेतली असून केंद्रीय गृहमंत्री पहलगाम येथे पोहचत आहेत. त्यामुळे येत्या काळात दहशतवाद्यांविरोधात खूप मोठी कारवाई होईल, हा मला विश्वास आहे. मी स्वत: तेथील प्रशासनाच्या संपर्कात आहे. आमच्याकडे सध्या जी काही यादी आलेली आहे. त्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक जखमी देखील झालेले आहेत. तिथे जी काही मदत पाहिजे आहे, ती तेथील प्रशासन करत आहे. तसेच आम्ही देखील तेथील प्रशासनाच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत, त्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत आता शांत बसणार नाही, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, पहलगामामधील आतंकवादी हल्ल्यात पुण्यातील एकाच कुटुंबातील दोन जण गंभीर, तर तीन जण सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, पुण्यातील संतोष जगदाळे, आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, कौस्तुभ गाबोटे आणि संगीता गाबोटे अशी एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत. दरम्यान, आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील 2 पुरुषांना गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तर, तीन महिला लष्कराकडे सुखरूप आहेत. दरम्यान, जगदाळे कुटुंबाच्या नातेवाईकाने सांगितले की, माझे सख्खे दीर आणि त्यांचे मित्र जखमी झाले आहेत.