Maharashtra Live Update : पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश बंदी
Sarkarnama May 03, 2025 09:45 PM
Ind Vs Pak : पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तानविरोधत आणखी एक कडक पाऊल

पाकिस्तानातून रस्ते आणि हवाई मार्गाने भारतात येणारी टपाल आणि पार्सलची वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पाकिस्तानी ध्वज असणाऱ्या कोणत्याही जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश दिला जाणार नाही. भारताची ध्वजवाहक जहाजही पाकिस्तानात जाणार नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात टप्प्याटप्याने कडक पावले उचलली आहेत.

Narendra Modi : दहशतवादविरोधातील लढाईस अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांच्यासह एक संयुक्त पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला. अंगोला आणि भारत या दोघांचे मत आहे की, दहशतवाद हा मानव जातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. आम्ही दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कडक कारवाईसाठी वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादविरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जोआओ लौरेंको यांचे आभार मानले. दहशतवादांविरोधात कडक पाऊल टाकण्याची वचनबद्धता त्यांनी पुन्हा उद्धृत केली.

अर्थव्यवस्थेला बसणार आणखी एका तगडा झटका

पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कडक कारवाईसाठी पडद्यामागून तयारी सुरु असली, तरी तत्पूर्वी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असल्याने भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एका सूचनेत म्हटले आहे की ही बंदी तत्काळ लागू होईल.

शिर्डीतील साईबाबा मंदिराला धमकीचा मेल

शिर्डीतील साईबाबा मंदिराला धमकीचा मेल प्राप्त झाला आहे. मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तक्रार करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आदिवासी विभागाचा साडे सातशे कोटींचा निधी वळवला;

लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी आदिवासी विभागाचा साडे सातशे कोटी रुपयांचा निधी वळविल्याचा आरोप होत आहे. यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच भडकले. गरज नसेल तर खाते बंद करा, असा घरचा आहेरच शिरसाट यांनी दिला.

भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका; आर्थिक नाड्या आवळल्या

भारताने पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापार थांबवला आहे. सर्व आयात आणि निर्यात थांबवण्यात आली आहे.

लोकलच्या मोटारमनचा आंदोलनाचा इशारा, मुंबईकर गॅसवर

मोटरमन विरुद्ध मध्य रेल्वे प्रशासनात सुरु असलेला वाद चिघळला आहे. सोमवारी मोटरमन्सनी अतिरिक्त सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या जवळपास दीड हजार लोकल फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Dhule Politics Update : धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधणार

धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार असून माजी आमदार शरद पाटील आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्यापक्षात प्रवेश करत राष्ट्रवादीचा घड्याळ हातात बांधणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार शरद पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईत प्रवेश करणार आहेत.

Mumbai Update : कल्याण-डोंबिवलीत आठ शाळा बेकायदेशीर; विद्यार्थ्यांच्या पालकांना महापालिकेचं मोठं आवाहन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आठ शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले असून, सर्वाधिक सात शाळा टिटवाळा परिसरातील आहेत.

Amol Kolhe And Girish Mahajan : PM मोदींच्या मनसुब्यात मंत्री महाजन मीठाचा खडा टाकतायेत; खासदार कोल्हेंनी सुनावले

BJP मंत्री गिरीश महाजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनसुब्यात मीठाचा खडा टाकतायेत, असा पलटवार शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी गिरीश महाजनांवर केला. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यावेळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. पण पहलगाम हल्ल्यावेळी धर्म विचारण्यात आला, ते का अन् कशासाठी? याचा विचार आपण करणार आहोत का? देशांतर्गत कलह निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता का? या अनुषंगाने मी वक्तव्य केलं होतं. पण मंत्री महाजन यांनी त्याचा वेगळा अर्थ काढून भडकाऊ विधान केले. मंत्री महाजन यांनी भान राखावं, असा सल्ला देखील कोल्हे यांनी दिला.

Bhandara Crime Update : भंडाऱ्याच्या करडीत दोन चिमुकलींवर अत्याचार; संतापजनक घटनेत आरोपीला अटक

आमिष देवून घराशेजारी राहणाऱ्या 8 आणि 9 वर्षीय दोन चिमुकलींवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना भंडाऱ्याच्या करडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अतुल बुराडे (वय 36) या नराधमाला पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयानं एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पीडित चिमुकलींवर लैंगिक अत्याचारानंतर त्यांना आरोपी मारण्याची धमकी देत असल्याचे पीडितेच्या पालकांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे.

Buldhana Update : मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला भीषण आग लागली असून, आगीत रेकॉर्ड रूममधील महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहेत. सकाळच्या सुमाराला लागलेल्या आगीत कारण मात्र अस्पष्ट आहे. अग्निशमन दल व मेहकर नगर परिषदेचे कर्मचारी आग विझविण्यात सहभागी झाले. आगीचे कारण संशयाच्या भोवऱ्यात आले आहे?

Beed Update : मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात; बाबासाहेब आगेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

भाजप मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून, 11:30 वाजता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावमध्ये जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत. भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. माजलगाव शहरातील भाजप कार्यालयासमोरच नारायण फपाळ याने कोयत्याने वार करत हत्या केली होती. मंत्री पंकजा मुंडेंनी कुटुंबियांना फोनवरून धीर दिला होता. आपण भेटायला येणार असंही आश्वासन दिलं होतं.

Lairaee Temple Stampede in Goa : गोव्यातील देवी लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी; 6जणांचा मृत्यू

गोव्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. येथील शिरगाव येथील श्री लईराईच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 70 हून अधिक लोक जखमी आहेत. जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालआणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

NEET Exam : 2024 च्या NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी 250 विद्यार्थ्यांवर कारवाई

2024 साली झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेली NEET च्या परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर उघडकीस आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय वैद्यक परिषदेने व नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबाबतची चौकशी सुरू केली होती. त्यानुसार आता जवळपास 250 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Pahalgam Terror attack : अनंतगानमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू

जम्मू काश्मीरच्या अनंतगान येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील अनेक भागात शोध मोहीम सुरू केली आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना मदत आणि माहिती पुरवल्याच्या आरोपातून या लोकांना अटक करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.