…तर पाकिस्तानवर असा घाव, ज्याची जखम कित्येक वर्षे भळभळत राहणार, शस्त्रसंधीनंतर भारताचा मास्टरस्ट्रोक काय?
GH News May 11, 2025 07:07 PM

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला आहे. या कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांवर हल्ला करणार नाहीत, असं ठरवण्यात आलं आहे. असं असलं तरी या दोन्ही देशांतील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. त्यामुळेच भारताचे सैन्य अजूनही हायअलर्टवर आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी भारताचे दोन निर्णय पाकिस्तानचं कंबरडं मोडू शकतात. भारताने हा घाव दिलाच तर पाकिस्तानची जखम भरायला पुढची कित्येक वर्षे जावे लागतील.

दोन्ही देशांत होणार चर्चा

येत्या 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओ यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधी, दहशतवाद या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेतून नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. भारत मात्र या चर्चेला जाताना काही ठोस अटी समोर ठेवून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधू पाणीवाटप करारावरील स्थगिती कायम राहील तसेच पाकिस्तानसोबतच्या व्यापारावरील स्थगितीही कायम राहील, अशी भूमिका भारत घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद या विषयावरच चर्चा होईल, अशी भूमिका भारत घेऊ शकतो.

…तर पाकिस्तानचं कंबरडं मोडणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून व्यापार होतो. भारताने मात्र आता पाकिस्तासोबतच्या व्यापाराला स्थगिती दिली आहे. भारत पाकिस्तानला अनेक महत्त्वाच्या गोष्टी निर्यात करतो. पाकिस्तान भारतावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. असे असताना भारताने व्यापारावरील बंदी कायम ठेवण्याची भूमिका घेतली तर त्याचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडू शकतं. विशेष म्हणजे भारताने असा निर्णय घेतलाच तर पाकिस्ताची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान सिंधू जलवाटप करारातून मिळणाऱ्या पाण्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. त्यामुळे भारताने या करारावरील स्थिगिती कायम ठेवल्यास पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. म्हणजेच भाराताचे हे दोन मास्टरस्ट्रोक पाकिस्तानला मोठे घाव देऊ शकतात.

पाकिस्तानची मात्र नरमाईची भूमिका

पाकिस्तानसोबत दहशतवादाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, असं भारतानं ठरवलं तर सिंधू जलवाटप करार आणि काश्मीरच्या प्रश्नावर नव्याने चर्चा होईल अशी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आशा आहे. त्यामुळे 12 मे रोजीच्या भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.