नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील वावद येथे दोन चिमुरड्यांसह आईनं विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मात्र पती व सासूच्या ज्याचाला कंटाळून महिलेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वावद येथे राहणाऱ्या ममता गणेश हरदास (वय २५) या महिलेनं ९ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात शिवारातील एका शेतात विद्या गणेश हरदास (वय ४ वर्ष) आणि साई गणेश हरदास (वय २ वर्ष) या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली होती. गावातील महिलेनं मुलांसह पाण्यात उडी मारण्याचं लक्षात येतात ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, विहिरीत पाणी खोल असल्याने अवघ्या काही क्षणात आईसह तिच्या चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. याठिकाणी ममता, विद्या आणि साई या तिघांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मयत महिलेचा पती गणेश प्रकाश हरदास (रा. वावद ता. नंदुरबार) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आईने आपल्या दोन मुलासंह विहिरीत उडी मारुन केल्याप्रकरणी मयत महिलेची आई सुनीताबाई सुदाम चित्रकथी यांच्या फिर्यादीवरून मयत महिलेचा पती गणेश प्रकाश हरदास आणि सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचं यात म्हटलं आहे. 'पती आणि सासू मोटरसायकल घेण्यासाठी ३० हजार रुपये माहेरवरून घेऊन यावे यासाठी मुक्ताबाई प्रकाश हरदास तिला त्रास देत. तसेच मोठ्या बहिणीला फोन का लावते असं बोलून मारहाण केली. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास देत या जाचाला कंटाळून ममताने जीव दिल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी सासू आणि पतीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बाभड करत आहेत.