पाकिस्तानला सर्व बाजूने घेरण्याची कवायत सुरू आहे. भारताने पाकड्यांना अवघ्या चार दिवसात गुडघ्यावर आणले. पाकमध्ये घुसून दहशतवादी अड्डे नष्ट केले. बलुचिस्तानची स्वातंत्र्य चळवळ आता बहरली आहे. त्यातच भारताच्या एका चालीने पाकड्यांचा जळफळाट झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अर्थात तालिबान सरकारला भारताने प्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केला असे नाही. तालिबान ही अत्यंत कट्टर धार्मिक संघटना सत्तेत आल्यापासून मानवाधिकारी, स्त्रीयांचे अधिकार पायदळी तुडवण्यात आले आहे. पण भारताच्या एका चालीने पाकड्यांना मिरच्या झोंबल्या आहेत.
फोनवर साधला संवाद
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवारी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. अफगाणिस्तानने भारताच्या याकृतीचे जोरदार स्वागत केले. भारत हा कायमस्वरूपी आपला मित्र असल्याची अफगाणी भावना बोलून दाखवण्यात आली. सार्वजनिक स्वरुपातील ही पहिली चर्चा आहे. यावेळी मंत्री मुत्तकी यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी भारताच्या भूमिकेची कड घेतली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या या भूमिकेचे कौतुक केले.
पाकिस्तानची आगळीक उघड
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यावेळी भारताने तालिबानच्या प्रांतावर सुद्धा हल्ले केल्याचा पाकिस्तानचा कांगावा उघड झाला. तालिबानने भारताने हा हल्ला केला नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुनीर आणि शरीफ यांच्या कानाखाली शेकली होती. खोटी वृत्त आणि अहवालाद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये काही शक्ती अविश्वास तयार करण्याचा प्रयत्न करत होते. त्याला ही सणसणीत चपराक असल्याचे भारताने स्पष्ट केले.
अफगाणी लोकांसोबत भारताची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. भारताने अफणाणिस्तानच्या विकासासाठी अनेकदा मदत केली आहे. आता यापुढे भारत अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधांबाबत काय करता येईल यावर धोरण ठरवणार असल्याचे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या चर्चेनंतर माहिती समोर आली आहे. आता व्यापार आणि इतर मुद्दांवर पुढील चर्चा होणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पाकिस्तानात गहजब उडाला आहे. भारताच्या या मोठ्या चालीने पाकिस्तानमध्ये उलटसूलट चर्चा सुरू आहेत.