भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका जून महिन्यापासून सुरु होणार आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान टीम इंडिया पाच कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या अंतिम फेरीच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नसेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. बीसीसीआय येत्या आठवड्याभरात कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करेल. कर्णधारापासून या संघात दौऱ्यासाठी कोणते खेळाडू योग्य ठरतील याची खलबतं सुरु आहेत. पण बीसीसीआयने टीम इंडियासाठी डिपार्चर शेड्यूल जवळपास निश्चित केलं आहे. आयपीएल स्पर्धा लक्षात घेत बीसीसीआयने हे शेड्युल तयार केलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय या दौऱ्यासाठी दोन गटात टीम इंडिया इंग्लंडला पाठवणार आहे. आयपीएस स्पर्धा 3 जूनला संपणार असल्याने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही स्पर्धा 25 मे रोजी संपणार होती.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कसोटी संघात निवड झालेल्या खेळाडूंचा पहिला गट 6 जूनला इंग्लंडला रवाना होईल. गौतम गंभीरसोबत काम करत असलेला इतर स्टाफ सध्या भारतात नाही. त्यामुळे ते थेट इंग्लंडला टीमसोबत असण्याची शक्यता आहे. तसेच आयपीएलच्या प्लेऑफमध्ये ज्या खेळाडूंचा संघ जागा मिळवू शकला नाही असे खेळाडू पहिल्या गटात इंग्लंडला रवाना होतील. आयपीएल संपल्यानंतर दुसरा गट 6 जूननंतर रवाना होणार आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 20 जूनला असणार आहे.
बीसीसीआयने या मालिकेची तयारी करण्यासाठी इंडिया ए संघही इंग्लंडला पाठवण्याची तयारी केली आहे. इंडिया ए संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन मैत्रिपूर्ण चार दिवसीय सामने खेळणार आहे. या सामन्यांची सुरुवात 30 मे रोडी कॅन्टरबरी येथे होईल. तर दुसरा सामना 6 जून रोजी नॉर्थम्प्टन येथे होईल. यानंतर 13 जून ते 16 जून दरम्यान भारत अ आणि भारतीय वरिष्ठ संघ यांच्यात सराव सामना होईल. या आठवड्याच्या सुरुवातील इंडिया ए संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीमुळे आयपीएल आणि इतर शेड्युल आखताना बीसीसीआयची चांगलीच दमछाक झाली आहे.