आयपीएलच्या 18 व्या मोसमात 59 सामन्यांपर्यंत प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झाला नव्हता. मात्र 60 व्या सामन्यानंतर एका झटक्यात 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. रविवारी 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. पंजाबने राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचा हा आठवा विजय ठरला.
तर त्यानंतर डबल हेडरमधील सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान गुजरातच्या सलामी जोडीने 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. गुजरातच्या या विजयासह आरसीबी आणि पंजाब किंग्स या संघांनीही प्लेऑफचं तिकीट मिळवलं. यासह पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला.
श्रेयस त्याच्या नेतृत्वात वेगवेगळ्या 3 संघांना प्लेऑफध्ये पोहचवणारा आयपीएल इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. श्रेयसने गेल्या 17 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली होती. तर श्रेयसने 2020 साली दिल्ली कॅपिट्ल्सला फायलनपर्यंत पोहचवलं होतं.
तसेच पंजाबची श्रेयसच्या कॅप्टन्सीत प्लेऑफमध्ये पोहचण्याची पहिली तर एकूण तिसरी वेळ ठरली. पंजाबने याआधी युवराजच्या नेतृत्वात 2008 साली आणि जॉर्ज बेलीच्या कॅप्टन्सीत 2014 या वर्षात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे यंदा श्रेयस अय्यर आपल्या नेतृत्वात पंजाबला आयपीएल ट्रॉफी मिळवून देत गेल्या 17 वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? याकडे पंजाब चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन श्रेयसची विक्रमी कामगिरी
दरम्यान पंजाबच्या खात्यात 12 सामन्यानंतर 17 गुण आहेत. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्या स्थानी आहे. पंजाबचे साखळी फेरीतील आणखी 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे आता पंजाबचं टॉप 2 मध्ये पोहचण्याचं पुढील लक्ष्य असणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 वेळा संधी मिळते. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी सलग 2 सामने जिंकावे लागतात. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी पंजाबचा टॉप 2 मध्ये पोहचण्याचं ध्येय असणार आहे.