Maharashtra News Live Updates : अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान
Saam TV May 22, 2025 05:45 PM
Pandharpur: पंढरपुरात पावसाने पुलाचा भराव खचला; पुलावरील वाहतूक बंद

पंढरपूर ते वाखरी दरम्यानच्या पालखी मार्गावरील पुलाचा मातीचा भराव खचला आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.

वाखरी येथे नवीन पुल उभारण्यात आला आहे. काल पहिल्याच पावसाने पुलाचा भराव खचला आहे. माती मिश्रीत मुरमाचा वापर केल्याचे यातून समोर आले आहे. भराव खचल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

Solapur: अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान

- अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आंबा पिकांचे मोठे नुकसान

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावातील हरिदास जमादार यांच्या केसर आंब्याचे 5 ते 7 लाखांचे नुकसान

- मनगोळी गावात अवकाळी पावसामुळे एकाच शेतकऱ्याच्या अडीचशे ते तीनशे केसर आंब्याच्या झाडांना फटका

- जिल्ह्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा चांगलाच चिंतेत

नागपूर सुरत महामार्गावर आज्ञात वाहनाच्या धडकेत दीड वर्षीय बिबट्या ठार

विसरवाडी गावाजवळ हॉटेल राहुल समोरील घटना....

कोंडाईबारी घाटातील जंगलातुन जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षा उपाय योजना नसल्याने जंगली प्राण्यांचा सुरक्षितेचा प्रश्न आला समोर..

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल....

पारध वरून पुसद कडे येणारी बस वालतूर गावाजवळ पलटून अपघात, अपघातात 8 ते 10 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती

पुसद आगाराची बस असून जखमींना चौढी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत

ज्या ठिकाणी बस उलटली तिथं विजेची ट्रांसफार्मर होत,मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

अपघातादरम्यान कुठलीही जीवित हानी झालेली नाही...

गणपतीच्या वर्गणी प्रमाणे पैसे गोळा केल्याचा अनिल गोटे यांचा खोतकरांवर आरोप

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शासकीय विश्रामगृह येथे मिळून आलेल्या एक कोटी 84 लाख रुपयांच्या घबाडासंदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केलेले आहेत, त्याचबरोबर काही धक्कादायक खुलासे देखील गोटे यांनी केले आहेत,

महानगरपालिका त्याचबरोबर आरटीओ विभाग तसेच आणखी इतर शासकीय अधिकाऱ्यांकडून गणपतीच्या वर्गणी प्रमाणे पैसे गोळा करण्यात आले असल्याचा आरोप गोटे यांनी लावला आहे, विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी हे सर्व पैसे गोळा करण्यात आले असल्याचा आरोप गोट यांनी लावला आहे,

या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर असून त्यांनी मात्र गोटे यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, गोटे यांची नेहमीची जुनी सवय असल्याच म्हणत या प्रकरणात गोटे यांनी कोतकर यांच्यावर लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत,

Maharashtra Politics: माजी आमदार अनिल गोटे यांचा आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा

खळबळ जनक खुलासे करीत विवीध शासकिय अधिकाऱ्यांकडून पैसै घेतल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांना देखिल संपर्क केला पण मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचा गोटेंनी केला आरोप

अवकाळी पावसाने साठवलेला कांदा भिजला, नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी

अवकाळी पावसाचा तडाखा नाशिकच्या येवला तालुक्यात दिसून येत असून तालुक्यातील भारम येथील प्रवीण रघुनाथ जेजुरकर या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून शेतामध्ये साठवून ठेवला होता. 2 दिवस रात्रीच्या आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने अक्षरशः या शेतकऱ्याचा साठवलेला कांदा भिजला गेल्याने या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे .

Nanded: नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन

पहेलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर देशभरात भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील ठीक ठिकाणी तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आला आहे. भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी नांदेडच्या हिमायतनगर आणि तामसा शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले

यंदाचा आषाढी पालखी सोहळा अगदी तोंडावर आलेला असतानाही पंढरपूर ते वाखरी या आठ किलो मीटर अंतर पालखी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी हा मार्ग खडतर राहणार आहे.

पंढरपूर ते आळंदी पालखी मार्ग पूर्ण झाला आहे. दोन वर्षांपासून वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी हा मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. कामाची गती पाहता आषाढी पूर्वी या मार्गाचे काम पूर्ण याची शक्यता कमी आहे.

अमळनेर नगरपरिषदेसमोरील दुकानांना अचानक आग; साहित्य जळून खाक

जळगावच्या अमळनेर येथील नगरपरिषदेसमोर असलेल्या तीन ते चार दुकानांना अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुकाने बंद असल्याने आग विझवताना अडचणी निर्माण झाल्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून दुकानांमधील कटलरी, पाण्याचे जार, फरसाण यांसारखे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी शटर तोडावे लागले. सुदैवाने जीवितहानी टळली असून अधिक तपास सुरू आहे.

अवकाळी पावसामुळे भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सध्या भुईमून काढणीला वेग आलेला आहे, आणि अशातच गेल्या दहा-बारा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडत असून खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे, आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे, आणि आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिराऊन घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, भुईमुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने भावांमध्ये मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमूग पिकातून निघणार अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र या आशेवर आता पाणी फिरल्याच दिसून येत आहे...

Pune Rain: कात्रज परिसरात जोरदार पाऊस, मुख्य रस्ते झाले जलमय

कात्रज व लगतच्या गावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

पावसाचा जोर असल्याने सर्वत्र पाणी-पाणी

मुख्य व अंतर्गत रस्ते जलमय

कामावरून घरी निघालेल्या कामगार वर्गांला त्रास भारती विद्यापीठ, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरात पाण्याचे लोट

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर, गोकुळनगर चौकात पाणी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्व लेनमध्ये पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नागरिकांचे हाल

कात्रज-स्वारगेट रस्त्यावर मोरेबाग येथे मोठ्या प्रमाणात पाणी

राजस सोसायटी चौकात पाण्याचे तळे

FYJC Admission: एफवायजेसी प्रवेश पोर्टलवर पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी

पहिल्या वर्षाच्या कनिष्ठ महाविद्यालय (एफवायजेसी) प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थी आणि पालकांनी तांत्रिक अडचणींची तक्रार केली.

पालकांनी दहावीच्या मूळ गुणपत्रिका पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिलेल्या मर्यादित वेळेबाबतही प्रश्न उपस्थित केलाय.

पुणे, मुंबईहून गोव्याला जाणारी दोन विमाने कमी दृश्यमानतेमुळे अन्यत्र वळवली

पुणे-गोवा विमान मंगळवारी हैदराबादला वळवले गेले, तर मुंबई-गोवा विमान बेळगावला वळवले गेले आणि नंतर डाबोळी येथे उतरले. दक्षिण गोव्यातील डाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणारी दोन विमाने एक पुण्याहून आणि दुसरे मुंबईहून मंगळवारी कमी दृश्यमानतेमुळे अन्य विमानतळांवर वळवली गेली.

पुण्यातील बीएमसीसीच्या ऐतिहासिक मैदानावर आज होणाऱ्या भूमिपूजन आणि अतिक्रमणा विरोधात युवक काँग्रेसचा तीव्र निषेध

बी एम सी सी महाविद्यालयांच्या हृदयात असलेल्या ऐतिहासिक आणि हिरवळीने नटलेल्या मैदानावर DES प्रायव्हेट युनिव्हर्सिटी व संबंधित संस्थेकडून तब्बल 60 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची नवीन इंजिनिअरिंग कॉलेज इमारत उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

हे प्रस्तावित बांधकाम पूर्णपणे खेळाच्या मैदानावर होत असून, असे असताना संपूर्ण कॅम्पस परिसरात इतर मोकळ्या जागा असताना मैदानावरच अतिक्रमण का? असा रोष युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे.

या माध्यमातून शिक्षणाच्या नावाखाली मैदानाचा विनाश आणि पर्यावरणाची गळचेपी केली जात आहे.

हे भूमीपूजन आज ठेवण्यात आले असून,ते थांबवले नाही तर आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.

तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पुजेची मे महीन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवींच्या सिंहासन पूजेची मे महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असुन भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी.असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक,तेलंगणा आणि इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ही अत्यंत श्रद्धेने केली जाते.बुकिंग’ वनोंदणी कालावधी २१ मे २०२५ सकाळी १० वाजता ते २६ मे २०२५ सकाळी १० वाजेपर्यंत.प्रथम सोडत:२७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता SMS द्वारे कळविण्यात येईल.प्रथम फेरीचे पेमेंट: २७ मे सकाळी १०.३० ते २८ मे सकाळी १० वाजेपर्यंत राहील तर व्दितीय सोडत (आवश्यकतेनुसार) २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता.व्दितीय फेरीचे पेमेंट :२८ मे सकाळी १०.३० ते २९ मे सकाळी १० वाजेपर्यंत. तृतीय सोडत (उर्वरित असल्यास) २९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता.तृतीय फेरीचे पेमेंट : २९ मे सकाळी १०.३० ते ३० मे सकाळी १० वाजेपर्यंत.अंतीम यादी प्रसिद्धी: ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे.सिंहासन पूजेच्या नोंदणीची माहिती लक्षात घेऊन वेळेत नोंदणी करावी,असे आवाहन मंदीर संस्थानकडुन करण्यात आलय.

बांगडा फेक आंदोलन प्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांची निर्दोष मुक्तता

मत्स्य अधिकाऱ्यांवर बांगडा फेक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यमधून तत्कालीन आमदार तथा विद्यमान मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांची येथील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत ६ जुलै २०१७ रोजी गाजलेल्या आंदोलनाचा आज निकाल लागला. यात मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत.

Maharashtra Weather: महाराष्ट्रात ४८ तासांत मुसळधार पाऊस आणि विजेमुळे २४ जणांचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि तीव्र विजांमुळे २३ जणांचा मृत्यू झालाय

तर ११ जण जखमी झाले आणि ५५ प्राण्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलीय.

सोमवारी १० जणांचा मृत्यू झाला पाच जणांचा वीज कोसळल्याने, तर पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

त्याच दिवशी ११ जण जखमी झाले पाच जण वीज कोसळल्याने, चार जण झाड कोसळल्याने आणि दोन जण पाण्यात बुडून जखमी झाले.

याशिवाय, विजेमुळे ५५ छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी आणखी १४ मृत्यू नोंदवले गेले, यामध्ये चार जणांचा वीज कोसळल्याने, एकाचा पाण्यात बुडून आणि दोघांचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला.

Sinhagad Road: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सुरक्षा रक्षक भिंत पडली

बारांगणी मळा सर्वे नंबर 128 रिया शालू रेसिडेन्सी धायरी

या ठिकाणची संरक्षण भिंत पडून दोन चाकी व चार चाकी गाड्या गाडल्या गेल्या

दोन दिवस झालेल्या पावसाने सुरक्षारक्षक भिंत कोसळली

दक्षिण पुण्यासाठी नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

188 कोटी 47 लाख रुपये खर्च, 125 एमएलडी क्षमता

असमान पाणीपुरवठा आणि गळतीमुळे दक्षिण पुण्यावर पाणीटंचाईचे संकट उडवले असताना आता या भागासह समाविष्ट झालेल्या गावांसाठी नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभा केला जाणार आहे

त्यासाठी 188 कोटी 47 लाख रुपये खर्च करून वडगाव येथे 125 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये काल रात्री जवळपास तीन तास धुवाधार पाऊस

पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचा ही शेतमाल भिजला..

पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल भिजू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मधून व्यापाऱ्यांना सूचना

शेतकऱ्यांचा शेतमाल शेडमध्येच उतरून त्या ठिकाणी लिलाव करावा अशा सक्त सूचना

आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहिणींसाठी

आदिवासींच्या विकासाकरिता आधीच तरतुदी पेक्षा कमी खर्च केला जातो त्यातही आता आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी चक्क लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आलाय.

त्यामुळे आदिवासी समाजाच्या संघटना खवळल्या असून त्यांनी आता थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे.

शासनाने आदिवासी विकास विभागाच्या वाट्याच्या कोट्यावधी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केलाय.

याबाबत दोन मे रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक अनुदान या उद्दिष्ट्याखाली 3240 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

त्यातून 335 कोटी 70 लाख इतका निधी आदिवासी विकास विभागाने बिम्स प्रणालीवर महिला व बाल विकास विभागासाठी उपलब्ध केला आहे.

हा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वितरित करण्यास शासनाने दोन मे रोजी मान्यता दिली या प्रकाराने आदिवासी समाज संतापला आहे.

वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरांमध्ये दाखल झाल्यात

यावर्षीचा मच्छिमारी हंगाम तोट्यात

मासेमारी हंगाम संपायला अजून 8 दिवस बाकी, मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यातही वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट

वादळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन

वादळी पावसाच्या या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी नौका आणल्या बंदरात

मच्छिमारांना सहन करावा लागतोय मोठा आर्थिक फटका

रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा

सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग..

मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरींमुळे परिसर जलमय

सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

ठक्कर बाबा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामवासीयांचा आंदोलन

आदिवासी बांधवांचा विकासासाठी असलेल्या ठक्कर बाबा योजनेचं निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलं. तुमसर पंचायत समितीच्या चिखला गावात आदिवासी बांधवाचाव वॉर्ड निधीची अफरातफर करून त्याची परस्पर विलेवाट लावण्याचा आरोप चिखला ग्रामवासियानी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात केला आहे.भ्रष्टाचार करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी करत चिखला ग्रामवासियानी ग्राम पंचायत समोर आंदोलन सुरू केलं आहे.

Badlapur: अवकाळी पावसामुळे बदलापुरात रस्ते जलमय, घोरपडे चौकात पाणीच पाणी

बदलापूर शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्ते सुद्धा जलमय झाल्याचं पाहायला मिळालं.

बदलापूर शहरातील प्रमुख चौक अशी ओळख असलेल्या घोरपडे चौकातही या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.

यंदाच्या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाच्या रूपाने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून यामुळे सखल भागात जलमय परिस्थिती निर्माण होतीय.

अद्याप शहरात नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे अवकाळी पावसामुळे पाणी साचण्याच्या घटना देखील समोर येतायेत.

बुधवारी रात्री बदलापूर शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बदलापूरमधील प्रमुख चौकशी ओळख असलेल्या घोरपडे चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

यामुळे वाहन चालकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढत तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागला.

Pune Unseasonal Rain: पावसाच्या तडाख्याने ऐतिहासिक फुले वाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक फुले वाड्याला फटका बसला आहे.

सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरील कवले आणि लाकडी भाग निखळले आहेत..

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिपूजक चबुतऱ्यावरील छताचा भागही खराब होऊन निखळला आहे.

शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या वास्तूची झालेली ही दुर्दशा चिंताजनक आहे.

प्रशासनाने त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पुण्यातील बिबवेवाडी अप्पर परिसरामध्ये प्राण घातक हल्ला करणाऱ्या आरोपींची काढली पोलिसांनी धिंड

दहशत पसरवण्यासाठी केला होता प्राण घातक हल्ला

काही वेळातच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बेड ठोकत काढली अप्पर परिसरात दिंड

दहशत मागणाऱ्या पोरांबरोबर राहू नका पोलिसांचं परिसरातील मुलांना आवाहन

Pune News: पुणे शहरातील धोकादायक बेकायदा फलक काढून टाका

शहरातील बेकायदा जाहिरातफलक, फ्लेक्स,बॅनर तातडीने काढून टाकण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना केल्या आहेत.

मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे काही भागांत फ्लेक्स पडल्याचे प्रकार घडले होते.

शहरातील जाहिरातफलक, फ्लेक्स यांचे संबंधित मालकांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.

बेकायदा फलक काढून टाका असा आदेश त्यांनी दिला.

भिवंडी वाडा महामार्गावर वाहतूक कोंडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

रात्री झालेल्या पावसामुळे भिवंडी वाडा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे तसेच रस्त्याचे काँक्रिटी करणाचे काम देखील अनेक ठिकाणी सुरू असल्याने या महामार्गावर भिवंडीहून वाड्याच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर तब्बल 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत . वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तारेवरची कसरत करत आहेत. तर या महामार्गावर पडलेले अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत

भंडाऱ्यात निघाली काँग्रेसची तिरंगा बाईक रॅली, भारत माता की जयच्या घोषणेनं शहर दुमदुमलं

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचं प्रत्युत्तर आणि भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ भंडाऱ्यात काँग्रेसच्या वतीनं तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातून काढण्यात आलेली ही बाईक रॅली खात रोड, मोठा बाजार, त्रिमूर्ती चौक आणि गांधी चौक अशी मार्गक्रण करून काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय आणि भारतीय सेनेचा जयघोष करण्यात आला.

Dharashiv Unseasonal Rain: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकरी,नागरीकांचे मोठे नुकसान

धाराशिव जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती, फळबागा, घरे, जनावरे व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा अशा सुचना भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने टमाट्याच्या बागा तसेच जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

अनेक भागांत घरांची पडझड झाली असून, जनावरांचे मृत्यू, वीजपुरवठा खंडित होणे, शेती पाण्याखाली जाणे आदी गंभीर प्रकार समोर आले आहेत.

Gateway To Mandwa: गेट वे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा 25 मेपासून बंद

मुंबईतील गेट वे ते मांडवा ही प्रवासी जलवाहतूक सेवा येत्या 25 मेपासून बंद करण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पावसाळ्याच्या कालावधी साठी ही सेवा बंद राहील.

पावसाळा संपल्यावर हवामानाचा अंदाज घेऊन बोट सेवा सुरू करण्यात येईल.

या काळात भाऊचा धक्का ते मांडवा ही रो रो सेवा मात्र सुरू राहणार असल्याचं मेरी टाइम बोर्डाकडून सांगण्यात आलं.

Solapur: उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग, ओढे - नाले खळखळून वाहू लागले

उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

उत्तर तालुक्यातील रानमसले, दारफळ गावडी,वडाळा,नान्नज, बीबीदारफळ, कळमण,कौठळी, पडसाळी भागातील ओढे - नाले दुथडी भरून वाहत आहेत.

दरम्यान,बहुतांश शेतकऱ्यांची मशागतीची कामे अद्याप बाकी आहेत.कित्येक वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रथमच मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे.अवकाळी नंतर मागोमाग मान्सूनही दाखल होत असल्यामुळे यंदा पेरणीसाठी उसंत मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उत्तर तालुक्यात बहुतांश भागात सोयाबीन,तूर, उडीद, मका,भुईमूग या पिकावर भर दिला जात आहे.अवकाळी पावसामुळे लवकर पेरणीच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत मात्र पाऊस शेतकऱ्यांना किती उसंत देतो यावर बरेच काही शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे मदार अवलंबून आहे.रानमसले- पडसाळी परिसरातील ओढे बंधारे तुडुंब भरले आहेत.ओढ्या लगतच्या विहिरीत पाणीसाठा वाढला आहे.दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकरी पेरणीसाठी बी - बियाणे खतांच्या जुळवाजुळवीसाठी लगबग वाढली आहे.

Jalna Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यातच जालन्यातील गिरिजा नदीला आला पुर

जालन्यात मागील आठ दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांचं फळबागांचं मोठ नुकसान झालं.

तर दुसरीकडे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद शिवारातून वाहणाऱ्या गिरिजा नदीला उन्हाळ्यातच अवकाळी पावसामुळे पूर आला आहे.

खडकी, गणेशनगर, शिरसगाव वागरुळ आणि बोरगाव खडक या भोकरदन तालुक्यातील गावांमधून ही नदी वाहते.

गिरीजा नदीला उन्हाळ्यात पहिल्यांदाच पूर आल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

यामुळे छोट्या-मोठ्या ओढ्यांना आणि नद्यांना देखील पूर येत आहे...

आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचं उघड, 476 एवढी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी

लातूर तहसीलदारांनी 25ते 65 वयोगटातील तब्बल 476 अर्जदारांना हे केवळ आधार कार्डच्या आधारे जन्मतारीख आणि जन्म ठिकाणाचा पुरावा मानून जन्माचे प्रमाणपत्र जारी केल्याच आता उघड झाल आहे..

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या समितीने हा धक्कादायक अहवाल दिला आहे....

तर या समितीने संबंधित अर्जदारांची पार्श्वभूमी आणि त्या व्यक्ती संबंधित असलेली माहिती ही खरी आहे का? याची चौकशी देखील पोलीस आणि इतर यंत्रणांनी करावी असा सल्ला दिला आहे...

दरम्यान भाजप नेते किरीट सोमय यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व माहिती उघड करण्याची मागणी केली होती., या सर्व संस्थास्पद जन्म प्रमाणपत्रांना तातडीने रद्द करावे यासाठी त्यांनी काही महिन्यापूर्वीच दोन वेळा लातूर जिल्ह्याचा दौरा देखील केला होता...

तर याच दौऱ्यात हा संशय त्यांनी व्यक्त करून या प्रकरणात चौकशीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती..

दरम्यान त्याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने चौकशी केल्यानंतर एकूण 476 अर्जदारांना केवळ आधार कार्डच्या आधारे जन्मतारीख आणि जन्म ठिकाणचा पुरावा ग्राह्य धरून जन्म प्रमाणपत्र दिल्याच उघड झालं....

दरम्यान अशा बोगस अर्जदारांवर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे...

ट्वीन टनेलसाठी आंतरराष्ट्रीय कंपनीचा सल्ला, तीन कंपन्यांचा प्रतिसाद, लवकरच डीपीआर

शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज बोगदा मार्ग (ट्वीन टनेल) करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचे निश्चित केले आहे.त्यासाठी जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया मागविण्यात आली असून, त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे..

या निविदांची छाननी करून एका कंपनीला प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम दिले जाणार आहे.

शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत.मात्र, उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे निश्चित केले होते.

येरवडा आणि कात्रज या दरम्यानचे अंतर अंदाजे वीस किलोमीटर आहे.या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.

कळमनुरी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी

हिंगोलीच्या कळमदूरी मध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, काल सायंकाळी व आज सकाळी देखील पाऊस बरसल्याने बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते तर या पावसामुळे किरकोळ व्यावसायिकांची मोठी अडचण झाली होती दरम्यान पावसामुळे रस्त्यावर निर्मनुष्य वातावरण देखील झाल्याचं पाहायला मिळालं

Maharashtra News Live Updates : बनावट कागपत्राचा साह्याने भरती घोटाळा प्रकरणात आणखी दोघाना अटक

- शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा, बनावट कागपत्राचा साह्याने भरती घोटाळा प्रकरणात आणखी दोघाना अटक...

- यामध्ये तत्कालीन बोर्डाचे अध्यक्ष तथा माजी उपसंचालक डॉ.अनिल पारधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयात तत्कालीन वेळेस कार्यरत असलेला लक्ष्मण मंगाम या लिपिकास अटक करण्यात आली आहे.

- *या सोबतच निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनाही अटक करण्यात आली आहे.. लक्ष्मण मंगाम यांच्या विचारपूस केल्यानंतर चौकशीसाठी बलावलेले माजी शिक्षण उपसंचालक डॉ. अनिल पारधी यांनाही अटक करण्यात आली.

- लक्ष्मण मंघाम हा अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता. पारधी पारधी यांची बदली होत्या त्याने स्वतःची बदली जिल्हा परिषदेत करून घेतली होती त्यानंतर तो आता महानगरपालिकेत कार्यरत आहे.

नाल्यातील सांडपाणी उल्हास नदीत - महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

घरगुती औद्योगिक सांडपाणी विना प्रक्रिया उल्हास नदीत सोडले जात असल्याने उल्हास नदीचे पात्र प्रदूषित होत आहे त्याचबरोबर उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे ही जलपर्णी काढण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे दरम्यान उल्हास नदीपात्रात दोन नाल्यांमधून पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दूषित होत असल्याने या प्रकरनी कल्याण डोंबिवली महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवन्यात आली आहे त्याचबरोबर इतर नगरपालिकांकडून नदीपात्रात सोडले जाणारे घातक सांडपाण्याचे स्त्रोत शोधण्याबाबतची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू असून यानंतर उल्हास नदी स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भुईमूंग पिकाचे नुकसान,हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास अवकाळी पावसाने हिरावला

शेतीच्या अनिश्चिततेत भर घालणाऱ्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून यवतमाळ जिल्ह्यात 590 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पुन्हा नुकसान झाल्याने आणखी नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भुईमूग,ज्वारी आणि तीळ या पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

दुचाकी झाडावर आदळल्याने ऐका तरुणाचा मृत्यू

अकोल्यात दुचाकी झाडावर आदळल्याने ऐका तरुणाचा मृत्यू झालाय.. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील वहाळा-अटाळी वळणावर हा अपघात झाला आहे. इंदल लहाचुरे असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. इंदल लहाचुरे हा तरुण बोरी आडगाव बाजारात चप्पल-बूट विक्रीचे दुकान लावत असे. नेहमीप्रमाणे बाजार आटोपून तो आपल्या दुचाकीवरून मळसुरकडे परतत होता. दरम्यान, वहाळा ते अटाळी या मार्गावर एका वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना त्याची दुचाकी थेट रस्त्यालगत झाडाला आदळली होती..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.