esakal May 28, 2025 12:45 AM

Ayushman Bharat Health Initiative For Cancer Patients: कॉंग्रेसच्या काळात कॅन्सरवर उपचार करताना कर्जबाजारी व्हावे लागत होते. मात्र, भाजप सरकारने देशातील गरिबांसाठी आरोग्यदायी वैद्यकीय प्रकल्प उभारले. देशातील सात कोटी रुग्णांवर मोफत उपचाराची सोय भाजप सरकारने केली, अशा शब्दात कॉंग्रेसवर शरसंधान साधत सरकारच्या आरोग्यावर केलेल्या खर्चाची आकडेवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली. निमित्त होते नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘स्वस्ती निवस’च्या भूमिपूजन सोहळ्याचे.

जगात मोठ्या प्रमाणावर मुखाचा कर्करोग आढळणारा देश म्हणून भारताकडे बघितले जाते. गर्भाशयाच्या मुख कर्करोगामुळे देशात प्रत्येक आठ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जात होता. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत.

त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट असून मध्यप्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ते वरदान आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शहा यांनी यावेळी दिले.

सादर केलेली आकडेवारी

भाजप व कॉंग्रेसच्या काळातील आरोग्यावरील तरतुदीची आकडेवारीच सादर करताना शहा म्हणाले, कॉंग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या अखेरच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ३७ हजार कोटींची तरतूद होती.

सात कोटी कर्करुग्णांवर देशात मोफत उपचार : शहा

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती वाढवून १ कोटी ३५ लाखांवर नेली. स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसच्या काळात देशात फक्त ११ एम्स होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर ११ वर्षांत देशात २३ एम्स रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली. २०१४ पर्यंत देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते. ते भाजपच्या काळात ७८० झाले. एमबीबीएस डॉक्टरांची संख्या ५१ हजार होती. ती १ लाख १८ हजारांवर पोचली आहे. पदव्युत्तर डॉक्टर ३१ हजार होते. निवासी डॉक्टरांची संख्या ७४ हजारांवर पोचली आहे.

निःस्वार्थ सेवेची भावना महत्त्वाची

ज्या संस्थांमध्ये कर्मठ लोक, समाजाप्रती सेवाभाव आणि रुग्णांबाबत निःस्वार्थ सेवेची भावना असणाऱ्या संस्था मोठ्या होतात असे शहा म्हणाले. आपण देशभरात अनेक संस्था विकसित होताना बघितल्या आहेत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट त्यापैकी एक आहे. आगामी काळात ही संस्था देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूट पैकी एक असेल यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सीईओ शैलेश जोगळेकर यांच्या जीवनात कॅन्सरमुळे दुःखद प्रसंग घडले. परंतु, त्यांनी आपल्या दुःखाचे रूपांतर समाजसेवेत करून त्याचा लाभ लाखो लोकांना व्हावा या भावनेने ही संस्था उभारली. अशी सेवाभावी वृत्ती फार कमी लोकांमध्ये असते, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.

या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, परनो रिको इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी शहा यांनी संस्थेच्या पाहणी केली. प्रास्ताविक शैलेश जोगळेकर यांनी केले.

संशोधन संस्था म्हणून विकास करणार : फडणवीस

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जगभरातील अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानुसार आगामी काळात लवकरच याठिकाणी एक प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात संशोधन संस्था विकसित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या आरोग्य संस्थेत सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. जागतिक स्तरावर जे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

असे आहे ‘स्वस्ती निवास’

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या व्यवस्थापनातर्फे कर्करुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवासाची ही योजना आहे. ‘स्वस्ती’ या नावाने ती ओळखली जाईल. येथे ४०० कर्करुग्ण आणि नातेवाईकांसाठी उपचारादरम्यान राहण्याची सोय आहे. उपचारासाठी दीर्घकाळ येथे राहता येईल. या सेवाभावी उपक्रमामुळे रुग्णांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.