66729
बांदा-दाणोली मार्गावर जीवघेणे खड्डे
अपघातांची मालिका; तत्काळ उपाययोजनांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः बांदा-दाणोली मार्गावर बांदा गवळीटेम्ब येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. तसेच याठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका घडत आहे.
बांदा-दाणोली मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. गोव्यात तसेच कोल्हापूर, पुणे येथे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या संख्येने वर्दळ असते. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाला आंबोली येथे जाण्यासाठी गोव्यातील पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. वाहन चालकांना विशेषतः दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. गोव्यात जाण्यासाठी तसेच आंबोली वर्षा पर्यटनासाठी जवळचा मार्ग असून या मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज येत नसल्याने पहिल्याच पावसात अपघात झाले आहेत.