ढिंग टांग
आदरणीय दादासाहेब बारामतीकर यांना जय महाराष्ट्र! मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे कारभारी मा. नानासाहेब फडणवीस यांनी ‘आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात चांगले नाहीत’ असे मत व्यक्त केले आहे. संवादात आपण दोघेही सपशेल नापास झालो आहोत, हे तुमच्या लक्षात आले का? हा रिझल्ट मिळाल्यामुळे माझा जाम मूड गेला आहे. इतका की काल घरी दिवसभर मी कुणाशी बोललोदेखील नाही. घरीसुद्धा विचारणा झाली, ‘‘गप्प का?’’ मी काय बोलणार? त्याचे असे आहे की, (राजकारणात) मनाविरुध्द काही घडले की, मी सरळ दरेगावात निघून जातो. तिथे शेतीवाडीवर गेल्यावर झाडाझुडपांशी बोलतो.
‘‘काय स्ट्रॉबेरीताई, काय म्हंटेय थंडी?’’ किंवा ‘‘अननसअण्णा, कईसा हय?’’ (का कुणास ठाऊक, पण अननस हा मला कायम साऊथइंडियन वाटत आलाय…असो.) माझ्याशी गप्पा मारल्यामुळे माझ्या दरेगावातल्या शेतात बांबू केवढा फोफावलाय, ते बघायला या!! आमच्या शेतावरील चिकूच्या झाडांशी गप्पा मारुन त्यांना रिझवले, त्यामुळे ती झाडे इतकी खुश झाली की आपण चिकूचे झाड असल्याचे विसरुन त्यांना सफरचंदे लागली! हल्ली मी ती सफरचंदाची झाडे म्हणून लोकांना दाखवतो!! आता झाडांशी बोलणारा माणूस संवादात चांगला नाही, असे म्हणणे आपल्या नानासाहेबांना शोभले काय? माझ्याविरद्ध इतके भोंगे गरळ ओकत असतात, पण मी कधी उत्तरे देत नाही. आपले काम बोलेल असेच मी म्हणतो. पण मीच नव्हे, कामही नीट बोलत नाही, असे दिसते. नाहीतर नानासाहेबांनी आपल्या नापास केलेच नसते. जाऊ दे.
यापुढे मी सगळ्यांशी अघळपघळ गप्पा मारायचे ठरवले आहे. संवादात कमी पडलो, असे निदान महापालिका निवडणुकांपर्यंत तरी कुणाला वाटायला नको.
एकदा या ठाण्याला…गप्पा मारायला! कळावे. जय महाराष्ट्र.
आपला. कर्मवीर
भाईसाहेब मु. पो. ठाणे.
प्रिय भाईसाहेब, जय महाराष्ट्र! मला तर हल्ली कसे वागायचे तेच कळेनासे झाले आहे. दादासाहेब आखडू वागतात, असे वाटू नये म्हणून मी गुलाबी जाकिटे घालू लागलो. हसून खेळून बोलू लागलो. महायुतीत येण्याआधी माझा एक तरी हसरा फोटो काढून दाखवा. पण मी इथे आल्यावर जाहीर हसू लागलो. ग्रामीण ढंगाचे विनोदही (जपून) करु लागलो. तरीही जर कुणी मला संवादात नापास करत असेल तर मग बोलणेच खुंटले!! आता संवादात पास होण्यासाठी मी काय समोरच्याचा गालगुच्चा घेऊ का? परवाच आपले दिल्लीचे वरिष्ठ नेते माननीय मोटाभाई येऊन गेले. त्यांच्याशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण ढिम्म! ते चष्म्यातून थंड नजरेने बघत राहिले. मी पुढे काय बोलणार? मला आश्चर्य वाटते की, आपले नानासाहेब फडणवीस संवादाच्या परीक्षेत दरवेळी पास कसे होत असतील?
मुळात आपले नानासाहेबच अति बोलतात असे माझे पहिल्यापासूनच मत आहे. उदाहरणार्थ, पहाटेचा शपथविधी मी केव्हाच विसरलो, पण ते मात्र ‘ती पहाट मी कधीही विसरणार नाही’ असे स्वत:हून सांगतात. मला वाटते, आपण दोघांनी महायुतीमध्ये (त्यांची) कॉपी करुन पास होण्यापेक्षा गप्प बसून काम करत राहिलेले बरे. निदान कार्यानुभवाचे तरी मार्क मिळतील!! वास्तविक राजकारणात संवादापेक्षा विसंवादाचेच बक्षीस मोठे असते, हे वेगळे काय सांगायचे? नानासाहेबांना विसंवादाचे महत्त्व आपण दोघेही यथावकाश पटवून देऊ. आणखी काय लिहू? अधूनमधून आपला. दादासाहेब बारामतीकर.
ता. क. : ‘देवासारखे गप्प रहा’ असे शाळेत मास्तर सांगायचे. ते खोटे होते!!