66770
सिंधुदुर्गनगरीत साकारणार ‘बायोपार्क’ प्रकल्प
‘मानव साधन’चा पुढाकार; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन सेंद्रिय शेतीला बळकटी देण्याबरोबरच औषधी वनस्पती आणि त्यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने मानव साधन विकास संस्थने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. सिंधुदुर्गनगरी येथे तब्बल पाच एकर जागेत बायोपार्कसारखा नवा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प नैसर्गिक संपदेला पुरक असून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू सांगितले.
ओरोस येथील जनशिक्षणच्या सभागृहात जिल्ह्यातील काही निवडक शेतकऱ्यांना आमंत्रित करुन या प्रकल्पाची शास्त्रीय माहिती दिली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटक व गोव्याचे इनकम टॅक्सचे तत्कालीन मुख्य आयुक्त (आयआरएस) पतंजली झा, आयआयटी मुंबईचे अरविंद जोशी उपस्थित होते. सिंधुदुर्गात पंचवीस वर्षांपूर्वी मंत्री प्रभू यांनी कोकणच्या शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मानव साधन विकास संस्थेची स्थापना केली. मनुष्यामध्ये असलेल्या उपजत कलागुणांचा आणि श्रमशक्तीचा वापर करून विविध क्षेत्रात खऱ्या अर्थाने रचनात्मक काम करून त्या घटकांचा सर्वांगीण विकास करावा, हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे विविध घटकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत ८० हजार लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. चार वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातही जनशिक्षणची ही लोकाभिमुख चळवळ सुरू झाली आहे.
परिवर्तन केंद्राच्या माध्यमातून मच्छिमार, महिला, युवक, माजी सैनिक आणि शेतकरी या घटकांसाठी काम सुरू आहे. सेंद्रिय शेती या संकल्पनेला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आणि सह्याद्रीच्या पट्यातील औषधी वनस्पतींचा शोध घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व शेतीपूरक संकल्पना राबविण्यासाठी मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रभू यांच्या डोक्यात बायोपार्क प्रकल्पाची कल्पना आली आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. यासाठी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाने जनशिक्षणच्या ओरस येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील पाच एकर जागा उपलब्ध करून दिली. जगभरात हवामानातील झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे सर्वजण चिंतेत आहेत. अशावेळी वनस्पती लागवड करणे आणि विशेषतः औषधी वनस्पती आणि त्यावर संशोधन करणे व रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणे हा या बायोपार्कचा मुळ उद्देश आहे. बायोपार्कची संकल्पना शेतकऱ्यांना समजावी यासाठी झालेल्या या कार्यशाळेसाठी मानव साधन संस्थेच्या विश्वस्त सौ. अदिती सावंत, डॉ. शरद सावंत, जनशिक्षणचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष योगेश प्रभू, परिवर्तन केंद्राचे समन्वयक नंदकिशोर परब, जनशिक्षणचे माजी विश्वस्त अॅड. नकुल पार्सेकर, जनशिक्षणचे संचालक सुधीर पालव आदी उपस्थित होते. नंदकिशोर परब यांनी सूत्रसंचालन केले.
..................
‘अणाव नर्सिंग’चा गरजूंना फायदा
मानव साधन विकास संस्थने अणाव येथे नर्सिंग कॉलेज सुरू केल्याने गरजू व होतकरू मुलींना आपले शिक्षण जिल्ह्यातच पूर्ण करता आले. या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त मुलींनी पदवी घेऊन मोठ्या शहरात प्लेसमेंट मिळवलेली आहे. गेल्या वर्षीपासून फिजोथेरपी हा विषय येथे सुरू करण्यात आलेला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.