गोंदवले : लग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या युवकाचा पाय घसरून माण नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पळशी (ता. माण) येथे घडली आहे. नवनाथ पाटोळे (वय ३०) असे या बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेनंतर सुरू झालेले शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.
पळशी येथील नवनाथ पाटोळे हे काल (मंगळवारी) जाशी येथे लग्न समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास ते पळशी-जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावर पोहोचले. या बंधाऱ्यावरून चालताना पाय घसरल्यामुळे तोल जाऊन ते नदीच्या पात्रात पडले. गेल्या चार दिवसांपासून माण नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याच्या वेगाने ते प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधाशोध सुरू केली; परंतु रात्रीच्या अंधारात शोधकार्यात अडचणी येत होत्या. आज सकाळी सहा वाजताच म्हसवड नगरपालिकेची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर शोधकार्याने वेग घेतला. सुरुवातीला ज्या बंधाऱ्यात ते पाय घसरून पडले, त्या परिसरात शोध घेण्यात आला; परंतु तिथे ते सापडले नाहीत. पुराच्या वेगवान पाण्यामुळे पुढील बंधाऱ्याकडे ते वाहून गेल्याची शंका आल्याने रेस्क्यू टीमने त्या दिशेने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. दोन बंधाऱ्यांमधील संपूर्ण परिसरात शोधूनही दुपारपर्यंत त्यांना शोधण्यात यश आले नव्हते. तरीही अखंडितपणे शोधकार्य सुरूच होते.
प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहीर, म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. म्हसवड नगरपालिकेच्या रेस्क्यू टीमच्या वतीने आज पहाटेपासून शोधकार्य सुरू करण्यात आले होते. या टीमसोबत अक्षय सोनवणे यांनीही पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्याप यामध्ये यश मिळाले नाही. दरम्यान, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहीर यांच्यासह पळशी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी घटनास्थळी दिवसभर थांबून होते.
महापूर आल्याने माण नदीने रौद्ररूप धारण केले असून, या पाण्यात नवनाथ वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे; परंतु या प्रसंगातही तो सुखरूप असेल, या आशेवर पाटोळे कुटुंबीय प्रार्थना करत आहे. म्हणूनच माण नदीची नवनाथच्या आई व पत्नी यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सुवासिनींच्या उपस्थितीत खणानारळाने ओटी भरली.
माण तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी.
- उज्ज्वला गाडेकर, प्रांताधिकारी, माण