परभणी : पुढील तीन दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ता. २९ मे रोजी हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
२९ ते ३१ मे दरम्यान मराठवाडा विभागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका कायम असून, शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने झाडांच्या फांद्या तुटण्याचा, वीज पडण्याचा तसेच वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याचा धोका असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी काढणीस तयार पिकांची योग्य खबरदारी घ्यावी. उघड्यावर ठेवलेले धान्य किंवा पीक संरक्षित ठिकाणी ठेवावे. शक्य असल्यास शेतीसंबंधीची कामे पुढे ढकलावीत असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी वादळादरम्यान घरात सुरक्षित राहावे, वीज चमकत असताना उघड्यावर असलेली धातूची साधने किंवा मोबाइलचा वापर टाळावा, प्रवास टाळावा किंवा अत्यंत आवश्यक असल्यास खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे.