वसई, ता. २९ (बातमीदार) : वसई पूर्वेकडील गोखिवरे तलावाचे सुशोभीकरण वसई-विरार महापालिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मनमुराद आनंद घेता येणार आहे; मात्र कामापूर्वी तलाव परिसरातील अतिक्रमण हटवावे व फादर वाडी येथून येणाऱ्या नाल्याचे तलावात जाणारे सांडपाणी रोखावे, अशी मागणी शिवसेनेचे वसई पूर्व शहरप्रमुख राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गोखिवरे येथील तलावात नाल्यातून होणाऱ्या पाण्याचा निचरा हा तलावात येत असतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना वसई-विरार महापालिकेने केली तर तलावाची स्वच्छता कायम राहील व नागरिकांनादेखील दिलासा मिळेल, असे पत्रात राजू पाटील यांनी नमूद केले आहे. तलावाचे सुशोभीकरण हे नागरिकांसाठी उत्तम उपक्रम आहे; मात्र आजूबाजूला असलेली अतिक्रमणे, तसेच प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण गरजेचे आहे. त्यामुळे सौंदर्यीकरण, स्थानिक नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सार्वजनिक जागा मिळावी, असे पाटील यांनी सांगितले. तलाव सुशोभीकरण आणि या कामापासून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत प्रभाग समिती जी सहाय्यक आयुक्तांना त्यांनी निवेदन सादर केले आहे.