आळेफाटा, ता. २९ : बेल्हा-नारायणगाव प्र. जि. क्र. ८ मार्गावर बोरी बुद्रुक आणि बोरी खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील पुलाच्या पायालगत असणाऱ्या संरक्षण भितीचे अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्या कामाला सुरुवात कधी होणार याचा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे.
कुकडी नदीवरील बोरी बुद्रुक ते बोरी खुर्द या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग १० ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या पुराच्या अतीप्रवाहामुळे कोसळला होता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर या पुलाच्या कामासाठी आमदार निधीतून एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाचे काम सुरु असताना या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे काम सुरु असतानाच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला होता.
परंतु, हे काम सुरु असताना पुलाच्या पायाचे काम करताना कुकडी नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत कित्येक वेळा पाण्याचा अडथळा नसताना देखील हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या पुलाच्या भरावाचे काम लवकरात लवकर न केल्यास भविष्यात पूल कोसळण्याचा धोका आहे.
ग्रामस्थांनी पूला संदर्भातील तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही अद्याप दखल घेतलेली नाही. वास्तविक पाहता संबंधित ठेकेदाराने हे काम करताना पुलाचा पाया पूर्णपणे भरून घ्यावा लागत होता. परंतु त्यांनी तसे न करता वरच्यावर पिलर उभा करून स्लॅब टाकला आणि पाण्यामुळे येथील पिलर खालील माती हळूहळू निघू लागली आहे. पावसाळ्यात या नदीला पूर येतो. या पुलाच्या भराव्याचे काम न झाल्याने पुलाला धोका असल्याने एवढा निधी असून देखील हे काम अपूर्ण असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे राहिलेले काम लवकरात लवकर करावे अन्यथा पूल कोसळला आणि काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, राजू भोर यांनी दिला आहे.