मुंबई : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. तसेच, वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आषाढी वारीसाठी केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली. ‘‘गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. वारकऱ्यांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे,’’ असे शिंदे यांनी सांगितले.
या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्यांना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.