मयुरेश कडव
बदलापूर : वांगणी- बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळे तीन वाहनं उलटली. यात दोन मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरला अपघात झाला. या अपघातात दोन वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता वाहन धारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
कल्याण- कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी- रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी या रस्त्याला ठेकेदाराने डांबरी पॅच मारले आहेत. मात्र हे पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे पावसामुळे रस्ता निसरडा बनला आहे. अवकाळी पावसामुळे हा रस्ता वाहन धरणकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. दरम्यान आज सकाळी याच ठिकाणी झाला आहे.
एका मागून एक तीन वाहने झाली पलटी
पावसामुळे धोकेदायक झालेल्या या रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ दोन मालवाहू पिकअप आणि एक स्कूटर घसरली. अपघात इतका भीषण होता, कि तीनही वाहनांनी पलटी मारली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रक चालक आणि स्कूटर चालक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात दिला.
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा
रस्ता बनवताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्यामुळेच हे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान आगामी काळात पावसाळ्यात असे आणखी अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.